ई-मेलमुळे झाली वाघसंख्येची पोलखोल

ई-मेलमुळे झाली वाघसंख्येची पोलखोल

नागपूर - विजेच्या धक्‍क्‍याने वाघ मृत पावत असताना ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आणि परिसरातील जंगलात ७१८ वाघ असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकृत मेल आयडीवरून प्रसारमाध्यमांना पाठविण्यात आली. अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क केला तेव्हा, त्यांनी ही माहिती आम्ही पाठविलीच नाही, असा कांगावा केला. त्यामुळे वनविभागाच्या मेल आयडीवरून ही माहिती पाठविण्याचा खोडसाळपणा कोणी केला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

वाघाची संख्या देशभरात कमी होत असताना भारतात वाढ असल्याबद्दल वन्यजीव विभागाने मान्य केले. मात्र, पाठविलेली आकडेवारी आम्हालाच बुचकळ्यात टाकणारी असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. देशात दोन हजार २२६ वाघ आहेत. महाराष्ट्रात २०० पेक्षा अधिक वाघ असून, मध्य भारतात ५००पेक्षा अधिक वाघ नसल्याचे सांगितले. 

वनविभागाने पाठविलेल्या पत्रकामध्ये मिश्रा यांचीही प्रतिक्रिया आहे. मात्र, या प्रकारामुळे तेदेखील बुचकळ्यात पडले. या मेलमुळे वन विभागाच्या खळबळ उडाली आहे.  

वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन ट्रस्टचे अध्यक्ष अनिश अंधेरीया यांनीही आपण अशा प्रकारची कुठलीही माहिती दिलेली नसून, मध्य भारतात साडे पाचशेपेक्षा अधिक वाघ नाहीत. ताडोबा- अंधारी आणि मेळघाट या परिसरात आम्ही कधीही कामही केलेले नाही. त्यामुळे ही चुकीची माहिती देण्याचा प्रश्‍नच नाही. वाघाच्या संवर्धनासाठी आम्ही काम करीत असून आमच्याकडील माहिती वनविभागाला देत असतो. ही माहिती आम्ही वनविभागाला कधीच दिली नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी या विषयावर पडदा टाकला. यामुळे वनविभागाच्या मेल  आयडीवरून चुकीची माहिती देणारा झरीतील शुक्राचार्य कोण, याचा तपास होणे गरजेचे आहे.  प्रसिद्धी व माहिती विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव हेही याबद्दल अनिभिज्ञ होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com