आशनाच्या मैत्रीसाठी अमिषाचीही आत्महत्या

अमिषा आणि आशना
अमिषा आणि आशना

नागपूर - सायंकाळपर्यंत वाट बघूनही जिवलग मित्र भेटायला आला नाही. त्यामुळे निराश होत आत्महत्येचा निर्णय घेतलेल्या बारावीतील विद्यार्थिनीच्या वर्गमैत्रिणीनेही ‘दोस्तीसाठी काहीही...’ म्हणत जीवनाला ‘अलविदा’ म्हटले. एकीने बहिणीला तर दुसरीने आईला फोन करून जीव देत असल्याचा निर्णय कळवला आणि सोबत कोराडी येथील तलावात उडी घेतली.  

आशना रवींद्र रोकडे (वय १७, रा. स्नेहदीपनगर) आणि अमिषा पटले (वय १७) या दोघी जरीपटक्‍यातील दयानंद आर्य कन्या महाविद्यालयातील बाराव्या वर्गात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी. बुधवारी (ता. ८) सकाळी साडेअकरा वाजता सायकलने महाविद्यालयात गेल्या. पार्किंगमध्ये सायकल ठेवली आणि बाहेर पडल्या. अमिषाने ट्यूशनमध्ये सोबत असलेल्या निशिकांत नागपुरे नावाच्या मित्राला बोलावले. आशनाचा रजत नावाचा जिवलग मित्र भेटायला येणार होता. ते तिघेही दुपारी २ वाजता कोराडी तलावाजवळ गेले. सायंकाळ होईपर्यंत रजत आला नाही. त्यामुळे आशना निराश झाली. तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अमिषाने तिची खूप समजूत घातली. निशिकांतनेही समजावले; पण ती समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती. निशिकांतने आशनाच्या आईला फोन करून माहिती दिली आणि तेथून निघून आला. गुरुवारी रात्री आठ वाजल्यानंतर आशनाने छिंदवाडा येथे राहणाऱ्या बहिणीस फोन केला. आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर अमिषानेही तिच्या आईला फोन केला. काही वेळातच दोघींनीही तलावात उडी घेतली. गुरुवारी सकाळी दोघींच्याही नातलगांनी कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्या दोघींच्‍या वर्गमित्रालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. आज शनिवारी सकाळी दोन्ही मैत्रिणींचे मृतदेह तरंगताना आढळले. ते आज शनिवारी सकाळी तलावातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

कोराडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशनाचे वडील मजूर तर आई गृहिणी. एक बहीण आणि मोठा भाऊ असा परिवार. भाऊ तापट स्वभावाचा असल्यामुळे त्याचा घरात वचक होता. आशनाने रजत नावाचा नातेवाईक मुलगा भेटायला येणार होता. त्याला भेटण्यासाठी त्या गेल्या दोन दिवसांपासून कॉलेजमधून दांडी मारत होत्या. मित्राला भेटायला गेल्याचे आशनाच्या भावाला कळले होते. त्यामुळे आता घरी गेल्यास आरडाओरड होईल, या भीतीपोटी आशनाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला .
 

शेवटचे शब्द ऐक ताई..! 
आशना ही सर्वांत लहान होती. तिची विवाहित बहीण रोशनी  छिंदवाड्यात राहते. आशनाने गुरुवारी रात्री आठ वाजता तिला फोन केला. माझे शेवटचे शब्द ऐक ताई... माझ्या हातून न सुधारण्यासारखी चूक झाली. आता जीवनाला अर्थ उरला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ एवढेच बोलून तिने फोन ठेवला. त्यानंतर अमिषानेही आईला फोन केला. ‘आई मला माफ कर...मैत्रीसाठी कायपण... यानंतर माझ्याशी तू बोलू शकणार नाही’, एवढे बोलून फोन ठेवला. त्यानंतर दोघींनीही तलावात उडी मारली. 

मित्राने टेकले हात 
निशिकांत दोघींसोबत अंबाझरी तलावावर गेला. त्यानंतर तिघेही फुटाळा तलावावर गेले. सायंकाळच्या सुमारात ते कोराडी तलाव परिसरात गेले. निशिकांत त्यांना घरी परत जाण्यासाठी तगादा लावत होता. त्यांनी ‘तू आम्हाला फिरायला आणले, असे पोलिसांना सांगू’, अशी धमकी देत होत्या. त्यामुळे तो त्यांच्यासोबत थांबला. मात्र, रात्र झाल्यानंतर त्याने अमिषाच्या आईला फोन करून माहिती दिली. तसेच स्वतःच्याही आईला फोनवरून माहिती दिली. त्यानंतर तो त्या दोघींना तलावावरच सोडून परतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com