नागपूर - पुढील वर्षी सप्टेंबरच्या अखेरीस पुण्यात विश्व साहित्य संमेलन होणार आहे; मात्र साहित्य महामंडळ किंवा महाराष्ट्रातील इतर कुठलीही संस्था याची आयोजक नसेल. जगभरातील साहित्यिकांना एका व्यासपीठावर आणणारी पेन इंटरनॅशनल ही संस्था हे संमेलन घेणार आहे.
या संस्थेचा एक भाग असलेले पद्मश्री डॉ. गणेष देवी यांनी आज (शुक्रवार) यासंदर्भातील अधिकृत माहिती पत्रकारांना दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अजेंड्यावरून विश्व मराठी साहित्य संमेलन बाद झाले आहे; मात्र पुण्यातील एका संस्थेतर्फे दरवर्षी सातत्याने स्वबळावर विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. "पेन इंटरनॅशनल (पोएट्री, एसेइस्ट आणि नोव्हेलिस्ट) ही संस्था गेली 97 वर्षे कार्यरत आहे. या संस्थेतर्फे 1933 मध्ये भारतात विश्व साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्यानंतर आता प्रथमच ही संधी भारताकडे चालून आली आहे. मला स्थळ निवडायला सांगितल्याने मी पुण्याला पसंती दिली. 26 ते 30 सप्टेंबर 2018 ला पुण्यात या संमेलनाचे आयोजन होईल,' असे डॉ. गणेश देवी यांनी सांगितले. संमेलनाचा उद्घाटन सोहळा पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये करण्याचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले. पेन इंटरनॅशनल ही संस्था जगभरात असून, संमेलनासाठी 150 देशांचे साहित्यिक भारतात येतील. मुख्य म्हणजे आतापर्यंत संस्था व संमेलनाच्या मुख्य पदांवर 40 नोबेल पुरस्कार विजेते राहिलेले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या संस्थेची भूमिका डावी किंवा उजवी नसून "लेखक' तिच्या केंद्रस्थानी आहे,त असेही डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.
|