नागपूर : उपराजधानीत काही दिवसांपूर्वी सुरू झालेले हत्याकांडाचे सत्र थांबता थांबत नसून शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचे चिन्हे आहेत. हत्याकांडाची मालिका थांबविण्याचे पोलिसांना नवे आव्हान आहे. केवळ जून महिन्यात तब्बल आठ खून झाल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मात्र, हत्याकांडाच्या सत्राला जून महिन्याची पार्श्वभूमी कायम आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात १७ खून झाले होते, हे विशेष. जानेवारी ते आतापर्यंत ४८ खूनांची नोंद पोलिस दप्तरी आहे. (Eight-murders-in-June-month-in-Nagpur)
गोळीबार चौकातील बागल आखडाजवळ अलोक मातूरकर याने कुटुंबातील पाच सदस्यांचा खून करून स्वत: आत्महत्या करण्याच्या घटनेची उपराजधानीसह राज्यभरात चर्चा आहे. दुसरीकडे एमआयडीसीतील १५ वर्षीय मुलगा राज पांडे याचे अपहरण व हत्याकांडापासून सुरू झालेले हत्यासत्र अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत. सलग होत असलेले हत्यासत्र थांबत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही संशय निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दुपारी शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व ठाणेदारांची गुन्हे आढावा बैठक घेतली.
आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगली कानउघडणी करीत आपापल्या हद्दीतील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले. मागील वर्षी जून महिन्यात १७ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यंदा या महिन्यात आतापर्यंत ८ खून झाले आहेत. २०१८ मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यात ६५ खून घडले होते. २०१९ मध्ये ५३, २०२० मध्ये ४५ आणि २०२१ मध्ये ४७ खुनांच्या घटनांची नोंद आहे. २०१८ आणि २०१९ च्या तुलनेत खून कमी असून गेल्यावर्षीपेक्षा एक खूनाची घटना यंदा अधिक घडली आहे.
(Eight-murders-in-June-month-in-Nagpur)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.