नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अकरावीतीळ रिक्त जागांची संख्या बऱ्यापैकी घटणार असून कनिष्ठ महाविद्यालयांना 'अच्छे दिन' येणार आहेत.
राज्यात दहावीच्या परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. त्यासाठी राज्यातून १६ लाखांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. संपूर्ण राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता तज्ज्ञ समिती विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे याबाबत विचार करीत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दहावीच्या निकाल ९३ ते ९७ टक्क्यांपर्यंत लागतो. यामध्ये कोकण प्रथम क्रमांकावर असते. याशिवाय सीबीएसईनेही दहावीची परीक्षा न घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तेही राज्य बोर्डात प्रवेश घेत असल्याचे दिसून येते. असे असतानाही अकरावी प्रवेशात किमान ४० टक्के जागा रिक्त असल्याचे दिसते. गेल्यावर्षी राज्यातील ५ लाख ४३ हजार ७८५ जागांपैकी ३ लाख ६६ हजार ६३७ जागांवर प्रवेश देण्यात आले. मात्र, राज्यात विविध महाविद्यालयातील १ लाख ७७ हजार १९८ जागा रिक्त राहिल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक, आयटीआयला पसंती दिली. मात्र, यावेळी परीक्षाच रद्द झाली असल्याने विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का निश्चित वाढणार आहे. त्यामुळे या रिक्त जागा भरण्याची चिन्हे आहेत. बारावीमध्ये ही असाच प्रकार दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदवी प्रवेशातील रिक्त जागांची समस्या दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कनिष्ठ महाविद्यालयासह वरिष्ठ महाविद्यालयांनाही अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
एकूण जागा - ५, ४३, ७८५
प्रवेश - ३,६६,६२७
रिक्त जागा - १, ७७,१९८
विभागनिहाय जागा
विभाग प्रवेश जागा रिक्त जागा
नागपूर ३४,७९९ ५९२५० २४,४५१
पुणे ७१,५५४ १,०७,०९५ ३४,५४१
मुंबई २,२३,५६१ ३,२०,७५० ९७,०९९
औरंगाबाद १६,९३३ ३१,४७० १४,५३७
नाशिक १९,७०० २५,२७० ५,५७०
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.