नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची घोषणा उपमुख्मत्री अजित पवार यांनी यापूर्वी केली असली तरी अधिवेशन नागपूर होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सरकारने शब्द फिरवल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होण्याचा इतिहास घडणार नाही. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी विरोध दर्शवून पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा सूर लावल्याची माहिती आहे. (Nagpur Adhiveshan News)
करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. वर्षातून किमान तीन अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. साधारणतः तिसरे म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. बोटावर मोजण्याइतके पावसाळी अधिवेशनही नागपूरला झाली. परंतु, कोरोनाच्या कारणामुळे गेल्या दोन वर्षात एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही. कोरोनामुळे उत्पन्नावर झालेला परिणाम आणि होणार खर्च लक्षात घेता मागील वर्षीचे हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास सरकारमधीलच काही मंत्र्यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे ते झाले नाही.
मुंबईला झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची घोषणा केली होती. घोषणेनुसार २८ फेब्रुवारीपासून हे अधिवेशन सुरू होणार होते. विधिमंडळ सचिवालयाने १६ फेब्रुवारीपासून सचिवालयाचे काम नागपूरमध्ये सुरू होणार असल्याचे परिपत्रकही काढले. परंतु बांधकाम विभागाला कोणत्यासू सूचना नसल्याने अधिवेशन होणार नसल्याची चर्चा प्रशासनात होती. आज त्यावर शिक्कमोर्तब झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळातील काही वरिष्ठ मंत्री अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी अनुत्सूक आहे. त्यामुळेच अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला घेण्याचे ठरविण्यात आले. १५ फेब्रुवारीला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात अधिकृत शिक्कमोर्तब करण्यात येणार असल्याचे समजते.
प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यास उत्सूक नाहीत. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठिक नव्हती. ते संपूर्ण अधिवेशनात उपस्थित आले नव्हते. त्यामुळे अजित पवार यांनीच अधिवेशनाची सर्व सूत्रे हलविली होती. भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्पी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात येईल असे सभागृहात जाहीर केले होते.
सहा वर्ष एकही अधिवेशन नाही
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आतापर्यंत सहा वर्ष एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही. वर्ष १९६२,१९६३,१९७९,१९८५, २०२० व वर्ष २०२१ ला नागपूरमध्ये एकही अधिवेशन झाले नाही. १९८६ ला झालेल्या चार अधिवेशनांपैकी २ अधिवेशन नागपूरला झाली होती. यातील एक अधिवेशन जानेवारीत झाले होते. परंतु नंतर मार्च महिन्यात मुंबईला अधिवेशन घेण्यात आले.
विदर्भातील मंत्री गप्प
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याच्या घोषणेनंतर आंनद व्यक्त करण्यात आला होता. परंतु आता हे अधिवेशन मुंबईला घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. परंतु याला विदर्भातील एकही मंत्र्याने विरोध दर्शविला नसून गप्प राहिल्याची माहिती आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.