पोलिसांचे आता मिशन ‘क्राईम कंट्रोल’

पोलिस आयुक्त : ३० सप्टेंबरपर्यंत विशेष मोहीम; पीडितांच्या घरी भेट देण्याचा निर्णय
Maharashtra Police
Maharashtra PoliceSakal

नागपूर - गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी शहर पोलिसांद्वारे ‘मिशन क्राईम कंट्रोल’ ही मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. मोहिमेत शहरातील फरार गुंडांना अटक, पिडित महिलांना आधार आणि हरविलेल्या महिला आणि बालकांचा शोध घेतल्या जाणार असून महिलांविरोधातील गुन्हे थांबविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून नागपूरला ‘क्राईम कॅपिटल’ म्हटल्या जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईतून नागपुरातील ‘क्राईम ग्राफ’ खाली आला असल्याचा विश्‍वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जुलै महिन्यापर्यंतच्या सर्व गुन्ह्याच्या आकडेवारीत गुन्हे कमी झाल्याची माहिती दिली. यावेळी खून, लुटणे, गंभीर जखमी करणे, चोरी आणि इतर गुन्ह्यात पोलिसांची कामगिरी उत्तम असल्याचे सांगितले. याशिवाय डिटेक्शन आणि कन्व्हीक्शन वाढल्याचीही माहिती दिली.

शहरातील फरार आणि अनेक गुन्ह्यात आवश्‍यक असलेल्या किमान तीन हजार आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलिसांद्वारे विशेष पोलिम मोहीम राबविण्यात येणार आहे. शिवाय मोक्का आणि तडीपार आरोपींवर प्रतिबंधक कारवाई, अवैध दारू विक्रेते आणि अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांद्वारे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. महिला पोलिसांद्वारे अत्याचार पिडित आणि विनयभंगाच्या गुन्ह्यातील पीडितांच्या घरी भेट देत त्यांना काही त्रास होतोय का? याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व पीडितांना मदत मिळाली काय? याचीही शहानिशा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) चिन्मय पंडित, निवा जैन उपस्थित होत्या.

घरफोडी, वाहन चोरींवर कंट्रोल मिळेना

शहरातील क्राईम कंट्रोलवर आकडेवारीतून पोलिस आयुक्तांनी दावा केला असला तरी, काही विशिष्ट पोलिस ठाण्यांतर्गत होणाऱ्या घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यात पोलिसांना सपेशल अपयश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यात ४२७ घरफोड्यांची प्रकरणे उघडकीस आली आहे. याशिवाय ८९६ मोटारसायकल चोरीच्या घटनांचीही नोंद करण्यात आली आहे.

७० टक्के डिटेक्शनचा दावा

पोलिस आयुक्तांनी शहरातील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविल्याचे सांगितले असून घडलेल्या गुन्ह्यांमध्ये ७० टक्के डिटेक्शन झाल्याचाही दावा केला आहे. विशेष म्हणजे ४ हात ५२८ गुन्ह्यापैकी ३ हजार २१० गुन्ह्यांचे डिटेक्शन झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, काही विशिष्ट घटनांमध्ये अद्यापही गुन्ह्यांचा तपास झाल्याचे चित्र दिसून येत नाही.

स्वांतत्र्यदिनाच्या निमित्ताने बंदोबस्त

शहरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावेळी २ हजार २२० पोलिस शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार असून बीबीडीएस, क्युआरटी आणि विशेष पथकांचाही समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी संघ मुख्यालयाला उडवून देण्याची माहिती समोर आली असताना, त्या पार्श्‍वभूमिवर चोख बंदोवस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com