
मनसेच्या नेत्यांनी शरण यावे - गृहमंत्री वळसे पाटील
नागपूर : आरोपींना शेधणे हे पोलिसांचे कामच आहे. तो कुठल्या राजीकय पक्षाचा आहे हा मुद्दा नसतो. त्यामुळे आरोपी असलेल्या मनसेच्या नेत्यांनी शरण यावे असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. गृहमंत्री अमरातवीच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी नागपूर विमानतळावरून अमरावतीकडे जाताना त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मनसेचे नते रजाकार असल्यासारखे पोलिस मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना शोधत असल्याचा आरोप मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला होता.
सध्या हनुमान चालीसा पठणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे यांनी मशिदीत भोंग्यावरून अजान केले जात असतील तर त्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे चार मे रोजी मुंबईत मनसेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली होती. यात एका महिला पोलिसाला धक्का देण्यात आला होता. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मनसैनिकांच्या धरपकडीवर नाराजी व्यक्त केली आहे. यावर वळसे पाटील यांनी आरोपींना शोधणे व पकडणे हे पोलिसांचे काम असल्याचे सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखणे ही गृह विभागाची जबाबदारी आहे. ज्या मनसे नेत्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे. पोलीस कायद्याप्रमाणे आपले काम करीत आहेत. त्यात गैर काही नाही. त्यामुळे कुणीही नाराज होण्याचे कारण नाही.
नागपुरातील रेल्वे स्थानकासमोर सापडलेल्या स्फोटकांबाबत स्पष्टता नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत स्फोटकांबाबत तपासात स्पष्टता आलेली नाही, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
Web Title: Mns Leaders Should Surrender Dilip Walse Patil Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..