water
water esakal

Nagpur : नागपूरकरांना दिलासा ; शहरात उन्हाळ्यातही मिळणार मुबलक पाणी

पाण्याचे टेंशन नाही; जलसाठे फुल्ल

नागपूर : उन्हाळा लागला की वाढत्या उन्हासोबतच नागपूरकरांना सर्वाधिक चिंता असते ती पिण्याच्या पाण्याची. या दिवसात पुरेसे पाणी मिळणार की नाही, असा प्रश्‍न असतो. मात्र त्यांचे हे टेंशन यंदाही मिटणार आहे.

गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे विदर्भातील बहुतांश जलसाठ्यांमध्ये सध्या पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरकरांना प्यायला आणि वापरायला मुबलक पाणी मिळणार आहे. हवामानतज्ज्ञांनी यावर्षीचा उन्हाळा ‘जम के’ तापणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यामुळे साहजिकच नागरिकांचीही पिण्याच्या पाण्यावरून धाकधूक व चिंता वाढली आहे. मात्र नागपूरकरांसह अमरावतीकरांनाही काळजी करण्याचे काहीएक कारण नाही. कारण नागपूर जिल्हा व विदर्भातील छोट्या-मोठ्या जलाशयांमध्ये सध्या पुरेसे पाणी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना पिण्यासोबतच वापरायलाही भरपूर पाणी मिळणार आहे.

गतवर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे विदर्भातील जवळपास सर्वच जलसाठे सध्या तुडुंब भरले आहेत. त्यामुळे यावेळी पाण्याची टंचाई जाणवणार नाही, हे निश्चित आहे. उल्लेखनीय म्हणजे, नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह, खिंडसी आणि कामठी खैरी जलाशयातही सध्याच्या घडीला पुरेसा जलसाठा शिल्लक आहे.

आजच्या तारखेत पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयात ६६.३ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक असून, कामठी खैरी व खिंडसी जलाशयात अनुक्रमे ७४.२२ व ८६.०६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विदर्भात सरासरीपेक्षा ३१ टक्के अधिक (१२२८ मिलीमीटर) पाऊस बरसला. २०१३ नंतर प्रथमच इतका पाऊस झाला. त्यामुळे अनेक धरणे तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले होते.

धरणातील जलसाठ्याची स्थिती (दशलक्ष घनमीटरमध्ये)

धरण सध्याचा साठा गतवर्षीची स्थिती

तोतलाडोह ६६.०३ टक्के ६६.१२ टक्के

खिंडसी ८६.०७ टक्के ५०.५९ टक्के

कामठी खैरी ७४.२० टक्के ४४.५४ टक्के

गोसेखुर्द ४७.४३ टक्के ७१.४३ टक्के

इटियाडोह ६९.२१ टक्के ४८.४२ टक्के

पुजारीटोला ६३.४७ टक्के ४५.२४ टक्के

आसोलमेंढा १०० टक्के ६९.०७ टक्के

बावनथडी १०० टक्के ५७.२६ टक्के

बेंबळा ५०.१२ टक्के ६५.६९ टक्के

खडकपूर्णा ५२.१७ टक्के ५७.७९ टक्के

काटेपूर्णा ५१.०५ टक्के ५९.६७ टक्के

अप्परवर्धा ६१.०१ टक्के ६६.०३ टक्के

दिना ४४.७६ टक्के ५१.५४ टक्के

चार वर्षांपूर्वी मिळाले होते दिवसाआड पाणी

चार वर्षांपूर्वी (२०१९ मध्ये) विदर्भात अपेक्षेपक्षा कमी पाऊस पडला होता. त्यावेळी पाणीपुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडले होते. त्यामुळे नागपूरकरांना चांगलाच फटका बसला होता. त्यावेळची बिकट स्थिती लक्षात घेता नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळाले होते. पिण्याच्या पाण्यासाठी चक्क मृतसाठा वापरण्यात आला होता.

शहरातील अनेक भागांमध्ये पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. उल्लेखनीय म्हणजे, मनपा प्रशासनालाही नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन करावे लागले होते. यावेळी ही परिस्थिती उद्भवणार नाही, हे निश्चित आहे.

अमरावती जिल्ह्यातही स्थिती समाधानकारक

नागपूर जिल्ह्यात मोठे १६, मध्यम ४२ आणि ३२६ लघू प्रकल्प आहेत. सध्या स्थितीत मोठ्या प्रकल्पांमध्ये ६७.०८ टक्के (गतवर्षी ६२ टक्के), मध्यम प्रकल्पांमध्ये ६६.५८ टक्के (गतवर्षी ५०.८६ टक्के) आणि लघू प्रकल्पांमध्ये ६७.०६ टक्के (गतवर्षी ५०.२९ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. तर अमरावती जिल्ह्यात मोठे १०, मध्यम २५ आणि ४११ लघू प्रकल्प आहेत.

येथील प्रकल्पांचीही स्थिती समाधानकारक आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांमध्ये ६४.०७ टक्के (गतवर्षी ७१ टक्के), मध्यम प्रकल्पांमध्ये ६८.०८ टक्के (गतवर्षी ६७.८७ टक्के) आणि लघू प्रकल्पांमध्ये ५१.०२ टक्के (गतवर्षी ६४.२२ टक्के) इतका पाणी साठा उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com