नागपूर : राज्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील वेंगनूर ग्रामपंचायत क्षेत्रात विशेष आरोग्य केंद्र स्थापन करावे, या मागणीसह स्थानिक नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्र पाठविले. न्यायालयाने या पत्राची गंभीर दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. राज्य शासनाला विचारणा करीत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
याचिकेनुसार, वेंगनूर ही संपूर्ण आदिवासीबहुल ग्रामपंचायत आहे. या अंतर्गत वेंगनूर, सुरगाव, अळंगेपल्ली, पडकोटोला या गावांचा समावेश आहे. ही गावे भौगोलिकदृष्ट्या दुर्गम व मागास आहे. जवळचे आरोग्य केंद्र हे २० किमी अंतरावर आहे. त्यामुळे, पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न उद्भवला तरीही तिथे जाणे शक्य होत नाही. परिणामी, या काळात अत्यावश्यक सेवा आणि गर्भवती मातांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे, वेंगनूर, सुरगाव, अळंगेपल्ली, पडकोटोला या चार गावांसाठी विशेष आरोग्य केंद्र स्थापन करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी एका पत्राद्वारे केली आहे.
वेंगनुर येथे उपकेंद्र स्थापन व्हावे यासाठी जिल्हा परिषद गडचिरोलीने २०१९ साली शासनाला प्रस्ताव पाठविला. मात्र, तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. या प्रस्तावात वेंगनूर सोडून इतर तीन गावांचा विचार करण्यात आलेला नाही, असेही या पत्रामध्ये नमूद केले आहे. न्यायालयाने न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. रेणुका सिरपूरकर यांची नियुक्ती केली असून ॲड. झिशान हक त्यांना सहकार्य करतील.
पाच महिने जगाशी संपर्क तुटतो!
गावालगत घनदाट जंगलात दिनाप्रकल्प कन्नमवार जलाशयाच्या जवळ वसलेले आहेत. पावसाळ्यात हे जलाशय पूर्णपणे पाण्याने भरलेले असते आणि त्यावर पूल नसल्यामुळे या गावात जाणे अशक्य होते. या काळात इतर गावांशी तब्बल पाच महिन्यांसाठी संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो. या काळात गावकऱ्यांना नावेने धोकादायक प्रवास करावा लागतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.