नागपूर : रस्ते अपघातांची स्थिती नागपुरात चिंताजनक आहे. अपघात झाल्यानंतर मनपा, नासुप्र (नागपूर सुधार प्रन्यास) व वाहतूक पोलिस विभाग अपघात का झाला याचा अभ्यास करून उपाययोजना आखत नाही. या तिन्ही विभागात सहकार्य, समन्वय आणि संवाद दिसत नसल्याची नाराजी केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
‘इंटेलिजंट सोल्युशन फॉर रोड सेफ्टी’ या विषयावरील कार्यक्रमात गडकरी बोलत होते. जगात रस्ते बांधकामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रथम क्रमांकावर आहे. प्राधिकारणाने बांधकामात नुकेच तीन जागतिक विक्रम केले आहेत. ३८ किमी प्रतिदिन याप्रमाणे रस्ते, महामार्ग बांधण्याची गती आहे. राजस्थानमध्ये नुकतीच ‘रोड कम एअरस्ट्रीप’ तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या शेजारी ४५० हेलिपॅड तयार करण्यात येत आहेत. अपघातामुळे निर्माण होणाऱ्या आणिबाणीच्या स्थितीत हे हेलिपॅड जीव वाचविण्यासाठी मदत करतील, असे गडकरी म्हणाले.
शहरातील अपघातांसाठी रस्त्यावर होणाऱ्या कारचे पार्किंग हे एक कारण असते. रस्त्यावर अवैधपणे पार्क केलेल्या कारचे फोटो काढण्याचे काम ‘जनआक्रोश’ सारख्या स्वयंसेवी संस्थांना दिले गेले पाहिजे. देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात व यात दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात.
यापैकी ७० टक्के मृत हे १८ ते ४० वयोगटातील तरुणांचे असल्याचे पुढे आले आहे. येत्या २०२५ पर्यंत अपघातांमध्ये ५० टक्के घट होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, २०३० पर्यंत शून्य अपघाताचे ध्येय आहे, असे गडकरी यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त मीना, सतीश चंद्रा, निवृत्ती राय, डॉ. विकास महात्मे, प्रो. नारायण आदी मान्यवर उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.