नागपूर : इंग्रज अधिकारी सॅंडर्सच्या हत्येनंतर शहीद शिवराम हरी राजगुरूंसह सुखदेव, भगतसिंग हे क्रांतिकारक भूमिगत झाले. प्रत्येक जण वेगवेगळ्या शहरात गेले. काही दिवस उत्तरप्रदेशात वास्तव्य केल्यानंतर राजगुरू एका क्रांतिकारी योजनेसह नागपुरात आले होते, अशी नोंद एका पुस्तकात आहे. परंतु, त्यांच्या या अत्यंत धाडसी क्रांतिकारी योजनेला शहरातील सुज्ञ मंडळींनी आवर घातल्याने अभूतपूर्व अशा क्रांतिकारी घटनेची नोंद इतिहासात होऊ शकली नाही.स्वातंत्र्यलढ्यात नागपूरचे मोठे योगदान आहे. पण काही घटनांचा उल्लेख स्पष्ट नाही. यापैकी एक म्हणजे शहीद राजगुरू नागपुरात आल्याचा प्रसंग होय. लकडगंज येथील अनाथ विद्यार्थी गृहाच्या सुवर्णमहोत्सव व अमृतमहोत्सवानिमित्त १९७४-७५ मध्ये काढलेल्या स्मरणिकेत शहीद राजगुरू नागपुरात आल्याची नोंद आहे.
नोंदीनुसार लाहोर येथे १७ डिसेंबर १९२८ रोजी सॅंडर्सच्या हत्येनंतर तीन दिवसांनी अर्थात २० डिसेंबर १९२८ रोजी राजगुरूंसह सुखदेव, भगतसिंग भूमिगत झाले. सँडर्सच्या हत्येनंतर ब्रिटिशांनी या क्रांतिकारकांना पकडण्यासाठी भारतभर मोहीम सुरू केली. लाहोर सोडल्यानंतर राजगुरू बनारसला गेले. तेथे काही दिवसांच्या वास्तव्यानंतर ते नागपुरात आले होते. नागपुरातील लकडगंज येथील अनाथ विद्यार्थी गृहाच्या सुवर्णमहोत्सव व अमृतमहोत्सवानिमित्त काढलेल्या स्मरणिकेत यासंबंधीची नोंद आहे. या संस्थेचा सुवर्णमहोत्सव १९७४-७५ मध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त काढलेल्या स्मरणिकेत तत्कालीन वृत्तपत्राच्या संपादकांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत राजगुरू यांनी अनाथ विद्यार्थी गृहाला दिलेल्या भेटीचा तसेच प्रत्यक्ष त्यांना बघण्याचा योग आल्याचे नमूद केले. हा किस्सा लिहिताना संपादकांनी सुरुवातीलाच ‘४५ वर्षे लोटली त्या प्रसंगाला’ असे नमूद केले. त्यामुळे राजगुरू १९२९ मध्ये शहरात होते यास दुजोरा मिळत आहे.
मात्र, ते नेमके किती काळ होते, याबाबत स्पष्ट नोंद नाही. या संपादकांनी पुढे लिहिले आहे की, राजगुरू हे इंग्रजांच्या ताब्यातील सीताबर्डी किल्ला उद्ध्वस्त करण्याच्या क्रांतिकारी योजनेसह आले होते. मात्र, नागपूरच्या तत्कालीन सुज्ञ मंडळींनी त्यांच्या उत्साहाला आवर घातल्याचे या स्मरणिकेत म्हटले आहे.
नागपूर सोडल्यानंतर पुण्यात अटक
शहीद राजगुरू यांना ३० डिसेंबर १९२९ रोजी राजगुरू यांना पुण्यात अटक करण्यात आली. त्याच दिवशी त्यांनी नागपूर सोडल्याची नोंदही त्यांच्याबाबतच्या इतिहासात मिळते. राजगुरू एक वर्ष भूमिगत होते. यातील फक्त काही काळ ते नागपुरात होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.