निसर्ग काढतो बळीराजाच्या डोळ्यातून पाणी! 

file photo
file photo

पचखेडी (जि. नागपूर) : कुही तालुक्‍यात सोयाबीन, कापूस, मिरची हे पीक घेतले जाते. यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिके पाण्याखाली आल्याने सडू लागली आहे. सूर्य प्रकाश मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीन कापनीला आले असताना पाणी परत जाण्याचे नावच घेत नसल्याने शेंगातच दाण्याला अंकुर फुटायला सुरुवात झाली आहे. निसर्ग जणू बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढत असल्याचे भासत आहे. 
यंदा अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांच्या काठावरील उभे पिकच वाहून गेले. कापसाला सूर्य प्रकाशच मिळत नसल्याने वाढ खुंटली आहे. मिरची पिकावर शेतकऱ्यांची दारोमदार अवलंबून असते. त्यामुळे बळीराजा लेकरापेक्षाही त्याची जास्त जोपासना करतो. मात्र, पावसाने मिरचीची लागवडच करू दिली नाही. काहींनी लागवड केलेली मिरची सूर्य प्रकाशाच्या अभावी खाली मान घालून आहे. आजघडीला शेतकऱ्यांचे मिरची लागवड पोटी एक एकराला 30 हजार रुपये, सोयाबीन पिकावर 20 हजार रुपये तर कापूस पिकावर 20 हजार रुपये खर्च होऊन गेले आहे. मात्र, काहीही हाती न आल्याने बळीराजा विवंचनेत सापडला आहे. 
तालुक्‍यात गोसेखुर्द व उमरेड कऱ्हांडला हे दोन राष्ट्रीय प्रकल्प झाले. यामध्ये लोकांचा रोजगार हिरावला गेला; मात्र सरकारने त्यांच्या रोजगारासाठी कोणतीही दखल घेतली नाही. तरीही नागरिक उरल्या सुरल्या जमिनीवर उदरनिर्वाह करतो आहे. प्रशासन स्तरावर याची गंभीर दखल घेऊन तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com