पोलिसांच्या ताब्यातील वाहने रातोरात हलविली

file photo
file photo

गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात रस्त्यांची कामे करताना बरेचदा जाळपोळीचा धोका असतो. त्यामुळे कंत्राटदाराची वाहने लगतच्या पोलिस ठाण्यात किंवा सुरक्षित ठिकाणी लावली जातात. असाच प्रकार दादापूर येथेही उघडकीस आला. जाळपोळीच्या आदल्या दिवसपर्यंत ही वाहने पोलिस ठाण्यालगतच्या परिसरात असताना अचानक ती दादापूरला नेण्यात आली. याबाबत संशय व्यक्त केला जात असून अर्थकारणाच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याची धक्कादायक
माहिती समोर आली आहे.
कुरखेडा तालुक्‍यातील दादापूर येथे नक्षल्यांनी 27 वाहने व अन्य यंत्रसामग्रीची जाळपोळ केल्याच्या घटनेचा संबंध संबंधित कंपनी आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराशी असल्याची चर्चा आहे. नक्षलवादी विकासकामांना नेहमीच विरोध करीत आले आहेत. मात्र, पुराडा- मालेवाडा रस्त्याच्या कामात आर्थिक तडजोड झाली होती. परंतु कंत्राटदाराकडून रक्कम न पोचल्याने नक्षल्यांनी दोन-तीनदा कंपनीच्या मिश्रा नामक व्यवस्थापकाला हटकले होते शिवाय दादापूरच्या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी व्यवस्थापकाची मोटारसायकल जाळून तंबी दिली होती. तेव्हाच मिश्रा यांनी कंपनी सोडून पलायन केले, अशी चर्चा आहे. कंपनीच्या महत्त्वाच्या व्यक्तीने मिश्राकडे मोठी रक्कम दिली होती. परंतु ही रक्कम नक्षलवाद्यांपर्यंत न पोचल्यानेच जाळपोळ करण्यात आली, अशी चर्चा आहे. मात्र खरे सत्य तपासात समोर येईल.
नक्षलवाद्यांनी जाळलेली सर्वच वाहने अमर कन्स्ट्रक्‍शन कंपनीची असून, ती छत्तीसगड पासिंगची आहेत. ही सर्व वाहने पुराडा पोलिस ठाण्याला लागून असलेल्या खुल्या जागेत ठेवण्यात येत होती. परंतु घटना घडली त्या रात्री बहुतांश वाहने अचानक दादापूरला आणण्यात आली. ती तेथे आणण्यास कुणी सांगितले? सुरक्षित ठिकाण सोडून धोका का पत्करला? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.
एकूणच आर्थिक व्यवहारातून झालेली जाळपोळ आणि त्यानंतर झालेल्या भूसुरुंगस्फोटात 15 पोलिस शहीद झाले. या साऱ्यांचा अर्थकारणाशी संबंध येत असल्याचे दिसून येते.
एका दगडात मारले दोन पक्षी
जाळपोळ व भूसुरुंगस्फोट या दोन घटनांमधून नक्षलवाद्यांनी दोन हेतू साध्य केले. एक म्हणजे जाळपोळीमुळे कामे करण्यास पुन्हा कुणी धजावणार नाही तर दुसरे पोलिसांची हत्या करून नक्षलवाद्यांनी चळवळ जिवंत असल्याचा सूचक इशारा दिला. 22 एप्रिल 2018 रोजी भामरागड तालुक्‍यातील कसनासूर येथे 40 नक्षवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर पोलिस, गृहविभाग व शासन नक्षलवाद संपल्याच्या अविर्भावात होते. मात्र, दादापूरच्या घटनेत दोनशेच्या वर दिसून आलेली नक्षलवाद्यांची संख्या व त्यानंतर घडवून आणलेल्या शक्तिशाली भूसुरुंग स्फोटाने जिल्ह्यात नक्षलचळवळ सक्रिय झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com