बाजार समितीत आवक मंदावली, लिलाव नगण्य

file photo
file photo

अमरावती ः रविवारपासून पावसाने संततधार धरल्याने येथील बाजार समितीमधील शेतमालाचे व आर्थिक व्यवहार प्रभावित झाले आहेत. शेतकऱ्यांनी बाजार समितीत पावसामुळे येणे टाळल्याने शेतमालाची आवक मंदावली आहे. गत सप्ताहात आलेला शेतमाल यार्डात सुरक्षित असल्याचे बाजार समिती व्यवस्थापनाने सांगितले.जून व जुलैमध्ये खंड पाडणाऱ्या पावसाने महनाअखेरीस हजेरी लावली. रविवारपासून झालेल्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे. मात्र बाजार समितीमधील व्यवहार प्रभावित झाले. शेतीचा हंगाम असल्याने गेल्या महिन्यातील पंधरवड्यानंतर बाजार समितीमधील आवक मोठ्या प्रमाणात मंदावली. ती जुलैमध्ये आणखीनच मंद झाली. अशातच अडीअडचणीतील शेतकरी शेतमाल घेऊन येत होता. त्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतमाल भिजण्याच्या भीतीने त्याने येणे टाळले आहे. मंगळवारी बाजार समितीत तुरीच्या 698, हरभऱ्याच्या 241 व सोयाबीनच्या 462 पोत्यांची आवक झाली. आवक झालेल्या शेतमालाचा लिलाव मोजक्‍याच अडत्यांनी केला. भाव खुलले, मात्र खरेदी-विक्रीचे व्यवहार फारसे झाले नाहीत. त्यामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली. दरम्यान, बाजार समिती व्यवस्थापनाने शेतमालाच्या सुरक्षिततेवर या वेळी विशेष लक्ष दिले आहे. आवक नसल्याने यार्डात पुरेशी व्यवस्था आहे. त्यामुळे आवक झालेल्या शेतमालास सुरक्षितता मिळाली, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे. माल भिजल्याची तक्रार नसल्याचे सचिव दीपक विजयकर यांनी सांगितले. भाजी व फळ बाजारात मात्र पावसामुळे चिखलाचे साम्राज्य झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com