बुलडाणा : मूर्तिजापूर तालुक्याचा (Murtijapur taluka) दौरा आटोपून मूर्तिजापूर पिंजर २८ किमी आणि पिंजर बाटा २० किमी अंतर पूर्ण करून सकाळीच बार्शीटाकळी गाठले. बस स्टॅंडवर ‘सकाळ’चे बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी संजय वाट यांनी `रिसिव्ह` केले. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने पाण्याचे दोन घोट घशाखाली उतरवले. तालुक्यातीस समस्यांवर चर्चा करताना काटेपूर्णा जलप्रकल्पाचा विषय निघाला आणि संजय वाट सांगू लागले, काटेपूर्णा जल प्रकल्पाच्या बांधकामाला १९६९ साली सुरुवात झाली. १९७४ मध्ये धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास पन्नास वर्षांचा काळ उलटला. मात्र, २०१८ मध्ये ‘बीजीएस’च्या मदतीने काढलेला गाळ वगळता या धरणातील गाळ काढण्यासाठी विशेष प्रयत्न झालेच नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाची (Project) सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी निघालो मग आम्ही प्रकल्पाच्या दिशेने. (New water drama in Barshitakali taluka)
दुष्काळी भाग असल्याने या काळात अनेक वेळा धरणाचा पाणी साठा पाच ते सहा टक्क्यांवर आला. काहीवेळा तर धरणातील मृतसाठ्यावर अकोलेकरांना तहान भागवावी लागली. त्यामुळे गाळात रुतलेला हा प्रकल्प क्षमतेच्या १०० टक्के पाणी देऊ शकत नाही. काटेपूर्णा धरणाच्या काठावरील कोथळी, वरखेड, देवदरी, फेट्रा, धानोरा, जांभरून, वाघा या गावांसह महान धरणाचे एकूण बुडीत क्षेत्र १२४३ हेक्टर आहे. यापैकी धरणाचे ७५ टक्के बुडीत क्षेत्र त्यावेळी उघड्यावर आले होते. तरी धरणातील गाळ उपसण्याकरिता कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे समजले. मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणातील जमा पाणीसाठ्याची अचूक माहिती मिळत नाही. गाळासह पाण्याची टक्केवारी दाखविली जात असल्याने अनेकवेळा पाणीपुरवहुठ्याचे नियोजन बिघडते.
उंटावरून शेळ्या हाकतात अधिकारी
संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानी व दुर्लक्षितपणामुळे धरणावरील विश्रामगृहाची व आजूबाजूच्या बांधकामाची तसेच बागेची व पर्यटकांकरिता राहण्याची सुविधा करण्यात आलेल्या खोल्यांची पडझड झाली आहे. काटेपूर्णा जल प्रकल्पाचे अधिकारी-कर्मचारी यांना राहण्यासाठी असलेल्या निवासस्थानाची अवस्था बिकट आहे. येथून मोठ्या प्रमाणात टिनशेड, लोखंडी पाईप, अँगल व इतर महागडे साहित्यदेखील गायब झाले. काटेपूर्णा धरणावरील जबाबदार अधिकारी, अभियंता मुख्यालयी राहत नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी राहून तेथूनच कारभार हाकतात. धरणाची सुरक्षा व देखरेख गेटमनच्या भरोशावर असल्याचा गंभीर प्रकार येथे दिसून येतो. धरणाच्या क्षेत्रफळ परिसरातील भूकंप मापक इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने इमारतीच्या आत काय आहे, हे सांगणे कठीण आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा
आपत्ती व्यवस्थापन व भूकंपाची अचूक नोंद घेण्याकरिता काटेपूर्णा धरणाच्या परिसरात भूकंप मापक यंत्र बसविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकरी अभियंत्यास २९ जून २०२० रोजी आदेश दिले होते. जवळपास सात-आठ महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र अद्याप भूकंप मापक यंत्र बसविलेले नाही. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात पूर्वतयारी करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला अधिकार आहेत. भूकंपासारख्या आपत्तीबाबत अचूक माहिती मिळावी यासाठी महान येथील काटेपूर्णा धरण परिसरात भूकंप मापक यंत्र बसविण्याचे आदेश देऊनही काम न झाल्याने अधिकारी किती तत्पर आहेत, हे दिसून येते.
(New water drama in Barshitakali taluka)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.