नव्या सरकारमध्ये अकोल्याची पाटी कोरी!

nobody from Akola in the new government
nobody from Akola in the new government

अकोला, : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये मंत्र्यांच्या संभाव्य यादीत तिन्ही पक्षांकडून अकोला जिल्ह्यातील एकाही आमदाराचे नाव नाही. त्यामुळे तुर्तास तरी अकोल्याची पाटी कोरीच राहणार असल्याचे दिसते.


विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्याने भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना शतप्रतिशद पाठिंबा दिला. मात्र राज्यातील सत्ता संघर्षात शिवसेना भाजपपासून वेगळी झाली. भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. शिवसेनेने काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबच मिळून महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करीत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. संभाव्य मंत्र्यांबाबत बुधवारी रात्री तिन्ही पक्षांची चर्चा झाली. त्यानंतर संभाव्य मंत्र्यांची जी नावे पुढे आली आहेत, त्यात अकोला जिल्ह्यातील एकाही आमदाराचा समावेश नाही. भाजपच्या चार आमदारांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. प्रथमच आमदार झालेले नितीन देशमुख यांना शिवसेनेच्या वाट्यातील मंत्र्यांमध्ये जागा मिळण्याची शक्यता नव्हतीच. तीनवेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेले गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाबाबत चर्चा सुरू होती. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातील डॉ. संजय रायमुलकर यांचे नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीत असल्यामुळे बाजोरिया यांचे नावही मागे पडले असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार राज्याच्या विधिमंडळातील दोन्ही सभागृहात नाही. त्यामुळे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात अकोल्याची पाटी कोरीच राहणार हे आता निश्‍चित झाले आहे.

पालकमंत्री कोण?
अकोला जिल्ह्यातील एकाही आमदाराला नव्या सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी मिळणार नसल्याचे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील संभाव्य मंत्र्यांची नावे घेतली जात आहे. अमरावती जिल्ह्यतील काँग्रेसच्या कार्याध्यक्ष ॲड. यशोमती ठाकूर आणि प्रहारचे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांची नावे संभाव्य मंत्र्यांमध्ये आहे. बुलडाण्यातून डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. संजय रायमुलकर यांची नावे आहेत. पश्‍चिम विदर्भातून पाचवे नाव संजय राठोड यांचे आहे. राठोड यांच्याकडे यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती तर डॉ. शिंगणे यांच्याकडे बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे उर्वरित दोघांपैकी डॉ. रायमुलकर यांच्याकडे वाशीम जिल्ह्याचे तर बच्चू कडू यांच्याकडे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पद प्रहारचे बच्चू कडू यांच्याकडे सोपविल्या जाण्याची दाट शक्यता आहे. मित्र पक्षांच्या कोट्यातून महाराष्ट्र विकास आघाडीत कडू यांचे नाव संभाव्य मंत्र्यांमध्ये आहे. कडू यांचा अकोला जिल्ह्याशी अनेक वर्षांपासून प्रहार संघटनेच्या माध्यमातून संबंध आला आहे. त्यामुळे संभाव्य पालकमंत्र्यांमध्ये त्यांचे नाव सर्वांत आघाडीवर घेतले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com