जनादेश नव्हे, आदेश यात्रा : आमदार बच्चू कडू

जनादेश नव्हे, आदेश यात्रा : आमदार बच्चू कडू

अमरावती : भारतीय जनता पक्षातर्फे मोझरी येथून सुरू करण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेत जनतेचा सहभाग नाही. ती केवळ आदेश यात्रा आहे, अशी टीका अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली. ईव्हीएममधील गौडबंगाल दहशतवादापेक्षाही भयंकर असल्याचे कडू म्हणाले.
सध्या मैदानात एकच पहेलवान आहे. कुस्ती होणार की नाही, हा प्रश्‍न आहे. दहा-दहा वर्षे आमदारकी, मंत्रिपदे उपभोगल्यानंतरही पुन्हा आमदार झालो पाहिजे, या लालसेपोटी कुठल्याही पक्षाचे जे कोणी पक्ष सोडत आहेत त्यांच्या लेखी विचारधारा, नैतिकतेला कुठलाच थारा नाही. नेतेच जर असे अस्थिर असतील, तर लोकांना पर्यायच राहणार नाही.
महाजनादेश यात्रेसाठी सरकारी यंत्रणेचा पद्धतशीरपणे वापर होत आहे. त्याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर व पर्यायाने जनतेवर पडणार आहे, असे सांगत ईव्हीएमविषयी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, सामान्यांकडे फक्त मतदानाचा अधिकार आहे. मात्र, ईव्हीएमचा दुरुपयोग होताना दिसतो. ईव्हीएममध्ये असा दहशतवाद घुसला, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत घातक होईल, असे आमदार कडू म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात संत्रा उत्पादकांच्या प्रश्‍नावर ठिय्या आंदोलनानंतर त्यांनी भाजपमध्ये विविध पक्षांतील नेत्यांचे वाढते इनकमिंग, ईव्हीएमवरून मनसेप्रमुख राज ठाकरे, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट या चर्चेतील मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपरोक्त भाष्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com