आता वीज पडून होणारी जीवितहानी टळणार; ते कसे? वाचा

Now the loss of life due to lightning will be avoided Gadchiroli news
Now the loss of life due to lightning will be avoided Gadchiroli news

गडचिरोली : जिल्ह्यात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात वीज पडून निष्पाप लोकांचा बळी जातो. मात्र, आता असे बळी जाणार नसून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मदत व पुनर्वसन विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींमध्ये वीजरोधकपोल यंत्र लावण्यात येणार आहे. या यंत्रणेसाठी ११ कोटी ५६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजेचा कडकडाट होऊन वीज पडून अनेक निरपराध लोकांचा बळी जात आहे. तर काही लोक गंभीर जखमी होत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंब, त्यांचे संसार उद्‌ध्वस्त होऊन आर्थिक व मानसिक त्रास त्यांच्या वारसांना सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेत मदत व पुनर्वसन विभागाच्या निधीतून वीज प्रतिबंध यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रथमच: चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची निवड करून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमध्ये वीजरोधक पोल यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यासाठी २० कोटी ९२ लाख रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींमध्ये वीजरोधक पोल यंत्र बसविण्यासाठी ११ कोटी ५६ लाख रुपये याप्रमाणे दोन्ही जिल्ह्यांतील एक हजार ३०२ ग्रामपंचायतींसाठी ३२ कोटी ४८ लाखांचा निधी मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे काम युद्ध पातळी सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वीज कोसळण्याचे प्रमाण मोठे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात विजा कोसळतात. केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर इतर ऋतूत अनेकदा अवकाळी पाऊस आला की वीज कोसळते. यात अनेक नागरिकांची प्राणहानी होते. गडचिरोली जिल्हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. अनेकदा शेतमजूर किंवा शेतकरी खरीप हंगामात चिखलणी, रोवणी करत असताना वीज कोसळून ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

धानाचे पीक साधारणतः: दसरा, दिवाळीच्या सुमारास कापणीला येते. या काळातही कित्येकदा अवकाळी व वादळासह पाऊस येतो. या वादळ वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसादरम्यान मोठ्या प्रमाणात वीज कोसळते. यात शेतशिवारात, माळरानावर किंवा रानात चरायला गेलेली जनावरे बळी पडतात. अनेकदा मनुष्यहानी होते. त्यामुळे अशा प्रकारच्या वीजरोधक यंत्रणेची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. आता ही मागणी पूर्ण झाल्याने विजेमुळे होणाऱ्या प्राणहानीची समस्या सुटणार आहे.

अंमलबजावणीला गती यावी

अनेकदा योजना मंजूर होतात, निधी मंजूर होतो. पण, प्रत्यक्ष अंमलबजावणी संथ होत असल्याने समस्या जिथल्या तिथेच राहते. या योजनेला निधी मंजूर झाला असून प्रारंभ चंद्रपूर जिल्ह्यातून झालेला आहे. आता गडचिरोली जिल्ह्यात निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्येही लवकरात लवकर ही यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मार्च महिना संपत आहे. पुढील एप्रिल, मे हे दोन महिने संपले की, पुन्हा पावसाळा प्रारंभ होतो. शिवाय एप्रिल, मे महिन्यातही अनेकदा वादळासह अवकाळी पाऊस येतो. म्हणून या उपक्रमाच्या अंमलबजावणीला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com