आता मिनीमंत्रालयातही महाविकास आघाडी

zp washim
zp washim

वाशीम : मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आता काही दिवस उरले आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतर व महाविकास आघाडीच्या प्रयोगाची चाचपणी जिल्ह्यातील राजकीय धुरीणांकडून सुरू आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा हा मुद्दा जागा वाटपात आघाडीचा गाडा पुढे सरकण्यास अडसर ठरण्याची शक्यता असून, जिल्ह्यात तिसऱ्या आघाडीचेही सूतोवाच होत असताना ही निवडणूक ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाशीम जिल्हा परिषदेवर गेल्या वीस वर्षापासून अडीच वर्षाचा अपवाद वगळता कायम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या सोबत सत्तेतील भागीदारी कायम ठेवल्याने भाजप, सेनेला या जिल्हा परिषदेत निर्भळ सत्तेपर्यंत कधी पोहोचताच आले नाही. सध्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे 17, राष्ट्रवादीचे आठ, भाजपचे सहा, शिवसेनेचे 7 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 4, भारिपचे तीन तर अपक्ष सात सदस्य निवडून आले होते. यातील मनसेचे दोन सदस्य सेनावासी झाले तर मालेगावचे सदस्य चंदू जाधव यांचे पद खारीज झाले. 

जागा वाटपाचा मेळ बसणार नाही?
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. काँग्रेसची नेतृत्वाची धुरा सांभाळणारे माजी खासदार अनंतराव देशमुख सध्या काँग्रेस बाहेर आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये सरळ दोन गट पडले आहेत. राज्यातील युतीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा प्रयोग करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा सूर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमधून येत असला तरी मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा व येणाऱ्या निवडणुकीतील जागा वाटप याचा मेळ बसणार नसल्याने हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

युती-आघाडी होणार तरी कशी
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीविरुद्ध भाजप-शिवसेना युती असा सामना आतापर्यंत झाला आहे. मात्र, आता काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख पक्षाबाहेर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत युती काँग्रेसच्या कोणत्या जनाआधाराच्या भरवशावर करावी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यात भाजप-सेनेचे निर्माण झालेले विळ्याभोपळ्याचे संख्य जिल्ह्यातील राजकारणात दुरगामी परिणाम करणारे आहे.

तिसऱ्या आघाडीची चाचपणी
राजकीय परिस्थितीत काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव व शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोळे यांनी जिल्ह्यात तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. ही तिसरी आघाडी तयार झाली तर जिल्हा परिषदेच्या राजकारणात वेगळे चित्र समोर येण्याची शक्यता आहे.    
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com