बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

गर्भवती महिलांसाठी सभा घेण्याचे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आवाहन 

गोंदिया - बाळंतपणाच्या वेळी गर्भवती महिला व नवजात बालकांचा मृत्यू होतो. यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी त्यांच्या नांदेड येथील अनुभवातून त्या कुटुंबातील पुरुष मंडळीची अर्थात पती व सासरे यांची दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी सभा घेण्याचे नियोजन केले आहे. या सभांमध्ये गर्भवती स्त्रियांना भरपूर व चौरस आहार कसा द्यावा, याची माहिती देण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून येत्या २७ जानेवारीला दुपारी १२ वाजता गर्भवती मातांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला गर्भवती महिलेचे पती व सासरे हे उपस्थित राहणार आहेत. माता व बालमृत्यू टाळण्यासाठी आता कुटुंबातील पुरुष मंडळींना सोबत घेऊन गर्भवती मातेच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सुनेला चांगले खाऊ घातले तर जन्माला येणारे अपत्यसुद्धा सुदृढ राहणार आहे. प्रत्येक गर्भवतीच्या कुटुंबातील व्यक्तींना त्या गर्भवती महिलेचे रक्तातील हिमोग्लोबीन व रक्तदाबाचे प्रमाण याची माहितीदेखील या विशेष सभेतून दिली जाणार आहे. यामुळे दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारच्या गर्भवती महिलांच्या सभेला सासरे व पती यांनी न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील माता व बालकांच्या आरोग्यामध्ये तसेच त्यांच्या पोषण स्थितीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्‍याम निमगडे, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंबादे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली.  सभेला तहसीलदार अरविंद हिंगे, अपर तहसीलदार के.डी. मेश्राम, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काळे यांनी गरोदर मातांचे हिमोग्लोबीनचे कार्ड नातेवाइकांना दाखविण्यात यावे. गरोदर महिलेचा रक्तदाब व हिमोग्लोबीनचे प्रमाण हे कुटुंबातील पती व सासरे यांना माहीत असले पाहिजे. स्त्रीच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने ते आवश्‍यक आहे. दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी गरोदर महिलांच्या कुटुंबातील पती व सासरे यांना या सभेला आवर्जुन बोलवावे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या सभेमुळे प्रत्येक कुटुंबाला विशेषत: पुरुष वर्गाला गरोदर स्त्रीच्या गरोदरपणाबाबतची तांत्रिक माहिती मिळेल व गरोदरपणातील धोके टाळण्यास व सुदृढ बालक जन्माला येण्यास मदत होणार आहे. मुलीचे लग्न १८ वर्षांच्या आत होणार नाही, याची कुटुंबातील सदस्यांनी काळजी घ्यावी. जन्माला येणाऱ्या दोन अपत्यांतील अंतर हे कमीत कमी ३ वर्षांच्या वर ठेवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com