दीड लाख व्यक्तींना क्षयाचा विळखा

दीड लाख व्यक्तींना क्षयाचा विळखा

नागपूर : केंद्र सरकारने देशातून टीबी निर्मूलनासाठी 2025 हे टार्गेट ठेवलंय. परंतु टीबीवर नियंत्रण मिळवणे सरकारसमोर मोठे आव्हान ठरले आहे. राज्यात क्षयग्रस्तांची संख्या कमी होत आहे, असा दावा सरकारकडून करण्यात येत असला तरी नुकतेच झालेल्या सर्वेक्षणात क्षयरोगाचे 1 लाख 47 हजार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यात 7 हजार नवीन क्षयग्रस्त आढळले असल्याची माहिती पुढे आली आहे. हीच बाब लक्षात घेत क्षयाच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय क्षयरोग मंच स्थापन करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाद्वारे टीबीमुक्त भारत निर्माण करण्यासाठी राज्य सरकारला प्रभावी अंमलबजावणी काय करता येईल याची विचारणा केली होती. राज्याचे प्रधान सचिव (आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय क्षयरोग मंच स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार ही समिती गठित करण्यात आली. समितीमध्ये आरोग्य अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, एनएचएम, क्षयरोग असोसिएशन, छातीविकार तज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच क्षयरोगावर काम करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश करण्यात आला आहे. देशात 28 लाख क्षयग्रस्तांची नोंद झाली आहे. प्रामुख्याने वयस्कांमध्ये क्षय आढळून येतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या नवजात बालकांमध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पुढे आले आहे. जन्मत: क्षयरोग झाल्यामुळे बऱ्याचदा या बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मार्च 2018 ते जानेवारी 2019 या कालावधीत राज्यात 1 हजार 441 बालकांना जन्मत: क्षयरोग झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. विशेषतः मुंबईत सर्वाधिक 659 बालकांना जन्मत: क्षयरोग झाल्याचे दिसून आले आहे. विशेष असे की, शासकीय रुग्णालयात 1 हजार 371 बालकांना जन्मतः टीबीचा संसर्ग झाल्याचे आढळले होते. तर खासगी रुग्णालयातही 70 बालकांना जन्मत:च क्षयाची बाधा झाली असल्याचे पुढे आले. क्षय नियंत्रणासाठी राज्यस्तरीय क्षयरोग मंच गठित करण्यात आला असून यामार्फत राज्यभरात कार्यक्रम घेण्यात येतील, असे राज्याच्या आरोग्य विभागाच्या क्षयरोग विभागप्रमुख डॉ. पद्मजा जोगेवार म्हणाल्या. नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) लेबर वॉर्डात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची प्रचंड गर्दी असते. दररोज 30-35 प्रसूती होतात. मात्र, येथील लेबर वॉर्डाजवळ क्षयरोगाचा (टीबी) वॉर्ड तयार केला आहे. विशेषतः येथे गंभीर क्षयग्रस्तांना ठेवण्यात येते. केंद्र शासन टीबी निर्मूलनाचे टार्गेट ठरवत असताना मेयो रुग्णालय प्रशासनाकडून लेबर वॉर्डानजीक टीबीग्रस्तांचा वॉर्ड तयार करून प्रसूत मातांसह त्यांच्या बाळांनाही टीबी संसर्ग पसरवण्याचे काम करीत आहे. एकप्रकारे केंद्र आणि राज्या शासनाच्या टीबीमुक्तीच्या धोरणाला हरताळ फासण्याचे काम मेयोचे प्रशासन करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com