Video : रुक्‍मिणी मातेच्या पालखीला पंढरपूरची आस, 425 वर्षांची आहे परंपरा

palakhi
palakhi

अमरावती : आषाढी एकादशी, पंढरपूर आणि मराठी माणूस यांचा अनोखा भावबंध आहे. पावसाळ्याबरोबरच वारकऱ्यांना पंढरपूरचे वेध लागतात. मन विठ्ठल चरणी रममाण होते आणि पावले पंढरीची वाट धरतात. विदर्भातूनही हजारो वारकरी दरवर्षी पंढरीला जातात आणि काही पालख्याही जातात. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे वारीची आणि पालखीची परंपरा खंडित होते की काय, अशी शंका भाविकांच्या मनात आहे. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून पंढरपूरला गेल्या 425 वर्षांपासून जाणारी आई रुक्‍मिणी मातेची पालखी याच मंदिर परिसरातील सत्यनारायण मंदिरात सध्या मुक्कामाला असून सर्व भक्तमंडळींना पंढरपूरची आस लागली आहे.


कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र लॉकडाउन आहे. परंतु नियोजित वेळेनुसार रुक्‍मिणी मातेच्या पालखीचे प्रस्थान 26 मे रोजी करण्यात आले. विश्‍वस्त व दिंडी सोहळा प्रमुख सुरेश चव्हाण यांनी विधिवत पूजा केली. याप्रसंगी उपाध्यक्ष वसंत डाहे, स्थानिक विश्‍वस्त अतुल ठाकरे, वासुदेव मरसकोल्हे, आकाश ठाकरे व ढोणे महाराज उपस्थित होते. शासनाने पालखी सोहळ्याला अद्याप परवानगी दिली नसल्याने ही पालखी सध्या मंदिराच्या परिसरातच ठेवण्यात आली आहे. शासनाकडून लवकरच परवानगी मिळेल, अशी आशा करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत पालखी मंदिर परिसरातील श्री सत्यनारायण मंदिरात ठेवली आहे व दैनंदिन पूजाअर्चा चालू आहे. शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करून पालखी पंढरपूरसाठी रवाना होईल.

शासनाच्या परवानगीने आषाढी एकादशीला नियोजित 10-15 वारकऱ्यांसहित निदान 2 ते 3 दिवस आधी श्री रुक्‍मिणी मातेची पालखी व पादुका पंढरपूर येथे जाऊ शकतात. त्यासाठी आवश्‍यक तो पत्रव्यवहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विठ्ठल-रुक्‍मिणी संस्थान श्रीक्षेत्र पंढरपूरचे अध्यक्ष यांच्याशी करण्यात आला आहे.


माहेरची महाराष्ट्रातील पहिली पालखी
कौंडिण्यपूरच्या रुक्‍मिणी मातेच्या पालखीला 425 वर्षांचा इतिहास आहे. रुक्‍मिणी मातेच्या माहेरून निघालेली ही महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे. रुक्‍मिणी मातेला साडीचोळी देऊन तिची बोळवण करण्यात येते व त्यानंतर आई रुक्‍मिणी मातेच्या पादुका भगवंतांच्या चरणाजवळ नेण्यात येतात. 425 वर्षांची ही परंपरा खंडित होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती भक्तांच्या वतीने शासनाकडे करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित
शासनाने परवानगी द्यावी
विदर्भात सात मानाच्या पालख्या आहेत. आई रुक्‍मिणी मातेची पालखी तसेच पादुका पंढरपूरला गेल्या नाहीत तर भगवंतांचे दर्शनसुद्धा अपूर्ण राहील. दररोजच्या नैवद्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विदर्भातील किमान पाच पालख्या व 25 वारक-यांना शासनाने दोन बसेस उपलब्ध करून परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही आमच्या वाहनाने पादुका घेऊन पंढरपुरात दाखल होऊ, असे विश्‍व वारकरी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com