भामरागड (जि. गडचिरोली) - सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारी (ता.9) रात्री बेजूर येथील एका व्यक्तीची हत्या केली. लालसू गुंडी आत्राम (वय 36) असे मृताचे नाव असून, ते भामरागड पंचायत समितीत ट्रायसेम योजनेंतर्गत कंत्राटी तत्त्वावर हातपंप यांत्रिकी म्हणून दहा वर्षांपासून कार्यरत होते.
मूळचे बेजूर येथील रहिवासी असलेले लालसू आत्राम भामरागड येथेच कुटुंबासह राहत होते. रविवारी ते बेजूर येथे मक्का जत्रेसाठी गेले होते. सायंकाळी जेवण झाल्यानंतर लालसू घरी कुटुंबासोबत गप्पा मारत बसले असता तेथे सशस्त्र चार ते पाच नक्षलवादी आले. त्यांनी लालसूला सोबत येण्याचे फर्मान सोडले. मात्र नातेवाइकांनी विरोध केला असता, त्यांनाही धमकी दिली. त्यानंतर त्याला गावाबाहेर घेऊन गेले. रात्री साडेदहाच्या सुमारास नक्षलवाद्यांनी त्याच्या तोंडात गोळी झाडली. त्यानंतर दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केला. तत्पूर्वी, एका झाडाखाली ठेवलेले त्याचे वाहनही आग लावून पेटवून दिले. मात्र, पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे.
|