परतीच्या पावसाचा "पाहुणचार' शेतकऱ्यांना भोवला, उमरेड तालुक्‍यात ओल्या दुष्काळाचे चित्र, 

परतीच्या पावसाचा "पाहुणचार' शेतकऱ्यांना भोवला, उमरेड तालुक्‍यात ओल्या दुष्काळाचे चित्र, 

उमरेड, (जि. नागपूर) : यंदाचा खरीप हंगाम तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल ठरला आहे. पावसाळ्यात झालेला सरासरीपेक्षा जास्त पाऊस व अनेक गावांमध्ये पूरस्थिती ओढवल्यामुळे लागवडीखालील क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर हंगामी हाती येत असतानाच दिवाळीत पाहुणचारासाठी आलेला परतीचा पाऊस शेतकऱ्यांना चांगलाच भोवला. तालुक्‍यात ओल्या दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. 
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पळता भुई थोडी करून सोडले आहे. शेतातील उभे धानपीक झोपले, कापणीला आलेले सोयाबीनच्या शेंगातच ओलाव्यामुळे दाणे अंकुरले. तर पात्या व बोंडावर आलेल्या कापसाला चांगलाच फटका बसला. कापसाच्या बोंडात पाणी शिरल्याने ते सडू लागले आहेत. यामुळे नवा कापूस येईपर्यंत तोडणी महिनाभर लांबली आहे. आधीच हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी फारशी उत्साहवर्धक नव्हतीच. पावसाने दिवाळीवर आणखीच विरजण घातले. 
मागील वर्षीच्या तुलनेत बाजारपेठेत उत्साह उरलेला नाही. गतवर्षी सोयाबीनची आवक 4 ऑक्‍टोबरपासून सुरू झाली होती. तर महिन्याखेरीस आणि नोव्हेंबरच्या प्रारंभी एकूण 51 हजार 224 क्विंटल सोयाबीन मार्केटमध्ये होते. तेव्हा 2 हजार 400 ते 3 हजार 300 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला होता. त्या तुलनेत यंदा सोयाबीनची आवक एक आठवडा लांबणीवर गेली आहे. ऑक्‍टोबर अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस मार्केट यार्डमध्ये 23 हजार क्विंटलची आवक झाली असून त्यास 3 हजार 640 रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनची आवक अर्ध्यावर आहे. याशिवाय सोयाबीनमध्ये ओलावा धरून आहे. ढगाळ वातावरणामुळे ते वाळविणे अशक्‍य आहे. 
त्याचप्रमाणे गेल्या हंगामात कापसाची आवक 22 ऑक्‍टोबरपासून सुरू झाली होती. या महिन्यात 4 हजार 367 क्विंटल माल बाजारपेठेत पोचला होता. कापसाला 5 हजार 400 ते 5 हजार 900 रुपये असा भाव होता. यावर्षी कापसाची आवकच झालेली नाही. खरेदीही सुरू झालेली नाही. याशिवाय कापूस आणखी महिनाभर लांबणीवर जाईल अशी शक्‍यता आहे. 

यंदाचा खरीप हंगाम अतिपावसामुळे शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल ठरला आहे. त्यांना सावरण्यासाठी सरकारने त्वरित तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून योग्य मोबदला मिळावा. यंदाचा खरीप अतिशय खर्चिक ठरला आहे. लागवडीचा खर्चसुद्धा निघणार नाही. याचा रब्बीवरही परिणाम होईल 
- रूपचंद कडू,
सभापती, बाजार समिती, उमरेड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com