राजकारण्यांचा साहित्यात हस्तक्षेप नको - नितीन गडकरी

राजकारण्यांचा साहित्यात हस्तक्षेप नको - नितीन गडकरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ - राजकारण्यांची एक मर्यादा असली पाहिजे. त्यांनी साहित्य, विद्यापीठ यांसारख्या बाकीच्या कामांमध्ये हस्तक्षेप करायला नको, असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले. 

९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते. ‘निमंत्रणवापसी’मुळे बहिष्काराच्या सावटात तीन दिवस रंगलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शेवटच्या दिवशीदेखील हजारोंच्या संख्येने लोकांनी हजेरी लावली. समारोप सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, संमेलनाच्या उद्‌घाटक वैशाली येडे, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, स्वागताध्यक्ष मदन येरावार, आयोजन समितीचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते, महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष डॉ. विद्या देवधर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

नितीन गडकरी म्हणाले, ‘‘राजकारण्यांनी इतर क्षेत्रांत हस्तक्षेप करू नये याचा अर्थ आपसांत संबंध असू नये असे नाही. त्यांच्यात संवाद आवश्‍यक आहे. संवाद नसेल तर तिथे वितंडवाद होतात. आणीबाणीच्या वेळी पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत यांनी सभा घेतल्या. त्यांच्या सभांना लोकांनी अलोट गर्दी केली. मात्र त्यानंतर ते दोघे राजकारणात आले नाहीत आणि कोणत्याच पक्षाला राज्यसभेत जागा मागितली नाही.’’

साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी वैशाली येडे यांना बोलावण्याच्या निर्णयाचे कौतुक करताना गडकरी म्हणाले, की अनेक मोठी माणसं खऱ्या अर्थाने छोटी आणि अनेक छोटी माणसं खऱ्या अर्थाने मोठी असतात. आपण संपर्कात येईपर्यंत हा अनुभव आपल्याला येत नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्‍याम दरणे यांनी केले.

जाता जाता...
संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यापासून नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवापसीवर कुणी ना कुणी भाष्य करतोय. या प्रकारावरून अनेकांनी आयोजक आणि महामंडळाला संमेलनाच्या व्यासपीठावरूनच लक्ष्य केले. आज समारोपाच्या वेळी सूत्रसंचालन करणारे प्रमोद दरणे यांनी मात्र भावुक होऊन आयोजकांची व्यथा मांडली. रमाकांत कोलते यांच्यावर आयुष्यात कधी एक शिंतोडाही उडाला नाही. पण संमेलनापूर्वी घडलेल्या प्रकाराने त्यांच्यावर अनेक आरोप झाले, त्या वेळी आम्ही सारे व्यथित झालो होतो, असे सांगताना दरणे यांच्या डोळ्यांत अश्रूही तरळले.

कर्तृत्वाचा गौरव
आर्णी तालुक्‍यातील लोणी या गावातले रहिवासी व यवतमाळमध्ये आदर्श शिक्षक म्हणून लौकिक असलेले द. तू. नंदापुरे आणि यवतमाळ जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाणारे सुभाष शर्मा या दोघांनाही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 सत्कार आणि आभार
समारोप सोहळ्यात डॉ. विद्या देवधर, डॉ. इंद्रजित ओरके, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, कौतिकराव ठाले-पाटील, डॉ. मिलिंद जोशी, विनोद कुळकर्णी, प्रकाश पायगुडे, कपूर वासनिक, दिलीप खोपकर, सुधाकर भाले, अनुपमा उजगरे, उज्ज्वला मेहंदळे, भालचंद्र शिंदे, प्रा. उषा तांबे, पुंडलिक अतकरे, राजेंद्र मुठाणे, शुभदा फडणवीस, राजन लाखे या महामंडळातील तसेच घटक संस्थांमधील पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. आयोजन समितीतील रमाकांत कोलते, घनश्‍याम दरणे, विवेक विश्‍वरूपे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com