राष्ट्रपती, शौर्य पुरस्कार दिला; शहिदाचा दर्जा नाही

वर्धा : मृतदेहावर आलेल्या तिरंग्यासह पुलगाव येथील स्फोटात शहीद झालेल्या चोपडे यांचा परिवार.
वर्धा : मृतदेहावर आलेल्या तिरंग्यासह पुलगाव येथील स्फोटात शहीद झालेल्या चोपडे यांचा परिवार.

वर्धा : पुलवामा हल्ल्याने सैन्यांचे बलिदान, त्यागाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पाकिस्तानला धडा शिकवावा, अतिरेक्‍यांना ठेचून टाकावे, अशी भावना व्यक्त होऊ लागली. तर दुसरीकडे राष्ट्रपती आणि शौर्य पुरस्कार मिळूनही शहिदाचा दर्जा न मिळाल्याने या दर्जाकरिता 13 शहीद जवानांच्या परिवारांनी शासनाने दिलेल्या पुरस्कारासह मृतदेहासोबत आलेला तिरंगा परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुलगाव येथील बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांनी दिल्ली येथे सोमवारी (ता. 25) पासून उपोषण पुकारले आहे. या उपोषणात सहभागी होण्याकरिता हे सर्व परिवार शनिवारी (ता. 22) दिल्लीला रवाना झाले आहेत. यासंदर्भातील माहिती त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे दिली आहे.
पुलगाव येथील दारूगोळा भांडारात 31 मे 2016 रोजी झालेल्या स्फोटात एकूण 19 जवान शहीद झाले होते. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, शौर्य पुरस्कार देण्यात आला. मात्र केवळ सहा जवानांना शहिदाचा, तर नऊ जवानांना शहिदासारखा दर्जा देण्यात आला. या निर्णयाविषयी 13 कुटुंबांनी नाराजी व्यक्त करीत उपोषणाचा निर्णय घेतला. शहीद परिवारातील सतवीरसिह पुनिया, राजपालसिंह, अमेदसिंह, संतलाल, ओमप्रकाश पलवल, रामनारायण यादव, विकास पाखरे, जया प्रमोद मेश्राम, सोहबा लीलाधर चोपडे, प्राची ए. धनकर, रोहिणी मेश्राम, वसंत येसनकर, गंगाधरराव बलस्कर आदी उपोषण करणार आहेत.
भेटण्याकरिता पंतप्रधानांना 10 पत्रे
सर्वच मृतांना शहिदाचा दर्जा देण्यात यावा, या मागणीकरिता शहीद कुटुंबांनी आतापर्यंत 10 वेळा पंतप्रधानांच्या नावे पत्र पाठविले आहे. यात भेटीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून साधी दखलही घेण्यात आली नाही. यामुळे उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे शहीद कुटुंबीयांनी सांगितले.
"बॉम्बने फरक केला नाही, तुम्ही का करता'
पुलगाव येथील दारूगोळा भांडारात स्फोट झाला. आगीचे लोळ उठले. यावेळी त्या आगीने आणि बॉम्बने याला शहिदाचा दर्जा मिळेल त्याला नाही, असा फरक केला नाही, मग तुम्ही का करता, असा सवाल शहीद चोपडे यांच्या कुटुंबाने केला.
नोकरी आणि सुविधांची घोषणा वाऱ्यावर
या हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी त्यांना सर्व सुविधा आणि सहा महिन्यांत नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची अद्याप पूर्तता झाली नसल्याची माहिती शहीद जवानाच्या पत्नी प्राची दांडेकर यांनी दिली.

शासनाने शहीद झालेल्या सर्वच जवानांना शहिदाचा दर्जा देणे अपेक्षित होते. पण येथे तसे झाले नाही. केवळ सहा जवानांनाच हा दर्जा देण्यात आला. यामुळे दिल्लीत जंतरमंतर येथे उपोषण करून मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार, शौर्य पुरस्कार, मृतदेहावर आलेला तिरंगा, मिळालेले सर्वच प्रमाणपत्र परत करणार आहोत.
-विकास पाखरे,
शहीद बी. पी. पाखरे यांचा मुलगा, पुलगाव, जि. वर्धा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com