काळाच्या ओघात हरवली कव्वाली

नागपूर - सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित कव्वाली स्पर्धेत कव्वाली सादर करताना वैशाली शिंदे. सोबत साथसंगत करणारे वादक कलावंत.
नागपूर - सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित कव्वाली स्पर्धेत कव्वाली सादर करताना वैशाली शिंदे. सोबत साथसंगत करणारे वादक कलावंत.

नागपूर - दीड दशकापूर्वी घुंगरांचा आवाज झाला की, घरासमोर वासुदेव आला हे मराठी मनाला समजत असे. शाहिरीतील डफ-ढोलाच्या कलेने मन हरखून जात होते. ही कला पिढ्यान्‌पिढ्यांपर्यंत टिकेल असे वाटत असतानाच आज एकाही वस्तीमध्ये कव्वालीचा सामना रंगताना दिसत नाही. काळाच्या ओघात कव्वाली हरवली. ज्या वस्तीमध्ये कव्वाली होत असे त्या वस्त्याच हरवल्या की काय, असा सवाल नागपुरातील कव्वालांची परिस्थिती बघून मनात उभा राहतो.

कव्वाली हा गीतप्रकार आहे. कव्वाली गाणाऱ्या गायकांना कव्वाल असे म्हणतात. उत्सव, सण, समारंभ अशा विशिष्ट प्रसंगांना रात्रभर कव्वाली गायनाचा कार्यक्रम केला जात होता. त्याकाळी कव्वालाची गाडी गावात आली की तरुण वर्ग कव्वालासमोर गर्दी करीत असे. चित्रपटातील कव्वालीवर सिनेमागृहात रसिक प्रेक्षक पैसे उडवत असत. परंतु, कव्वालीला असलेला लोकाश्रय आता कमी झाला आहे. कव्वाली, शाहिरी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून होणारी संस्कारांची परंपरा थांबली आहे, अशी खंत नुकतेच नागपुरात झालेल्या कार्यक्रमात कव्वालांनी व्यक्त केली.

उपराजधानीचा विचार करता किरण पाटणकर, अयुब खानपासून, प्रकाश पाटणकर यांच्यापासून तर रंजना शिंदे, वैशाली शिंदेपर्यंत राज्यात कव्वालांची फौजच आहे. परंतु, आज पोटाची खळगी भरण्यासाठी आयुबभाई मनचला या कव्वालाचे कुटुंबीय रस्त्यावर बसून कव्वाली गातात. त्यांचा पिढ्यान्‌पिढ्या कव्वाली गायनाचा व्यवसाय आहे. ते कव्वाली गायनाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर रचलेल्या कव्वालीतील गितांनी चळवळ उभी केली. ‘चढता सूरज धीरे धीरे’, ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ अशी कव्वालीतील गीते ऐकून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. मात्र, अलीकडे पोट भरण्याचे वांदे असल्याची खंत कव्वालांनी व्यक्त केली.

गायन सुटले अन्‌ नशिबी मोलमजुरी
नागपूरच्या प्रतिष्ठित कव्वालाचे कव्वाली गायन सुटले अन्‌ नशिबी मोलमजुरी करण्याची वेळ आली. परिस्थिती हलाखीची बनली. भाड्याच्या खोलीत वास्तव्य आले. कव्वाली गायनासाठी राज्यात फिरणारा हा कव्वाल काळाच्या दुष्टचक्रात सापडला. ‘टीव्ही’ने कव्वालांना भिकेला लावले अशीही व्यथा काही कव्वालांनी बोलून दाखवली आहे.

कव्वालीच नव्हे तर एकूणच लोककला जगविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. कव्वाली महाराष्ट्राची शान आहे. कव्वाली कलेतून स्वातंत्र्याचा संग्राम त्या काळी पेरला होता. महापुरुषांची प्रेरणा देणारी गीते कव्वालीतून पुढे आली. म्हणूनच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनात कव्वाली स्पर्धा सुरू केली. या उपक्रमातून कव्वालीला चांगले दिवस येतील. ४५ कव्वाल स्पर्धेत सहभागी झाले होते.
- डॉ. सिद्धार्थ गायकवाड, उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com