गेल्या चार वर्षात यवतमाळ जिल्ह्यात अडीच कोटी वृक्ष लागवड, यंदा मात्र कोरानामुळे प्रश्‍नचिन्ह!

vruksh lagvad
vruksh lagvad

यवतमाळ : मानवाने स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी प्रचंड प्रमाणात वृक्ष तोड केली, परिणामी पर्यावरणाचा अपरिमित ऱ्हास झाला. पर्यावरणाची ही हानी रोखण्यासाठी शासनाने वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आणि त्याला गोमटी फळे आली. राज्य शासनाने गेल्या चार वर्षांत 33 कोटी वृक्ष लागवडीची योजना यशस्वीपणे राबविली. या कालावधीत जिल्ह्यात अडीच कोटीच्या घरात वृक्ष लागवड झाली. यातील जवळपास दोन कोटी वृक्ष जिवंत असल्याची नोंद कागदावर आहे. महाविकास आघाडी सरकारनेही वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले. मात्र, कोरोनामुळे योजनेला खीळ बसण्याची शक्‍यता आहे.

तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आहे. पर्यावरण जतन करण्यासाठी तापमानातील वाढ, हवामान यामुळे होणारी दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाने 2016 साली 50 कोटी वृक्ष लागवडीची योजना जाहीर केली. यात पहिल्या वर्षी 2016-17 या वर्षांत 16 लाख 17 हजार वृक्ष लागवड केली. एक ते 31 जुुलै या कालावधीत हे उदिष्ट ओलांडून पहिल्याच वर्षी जिल्ह्याने चांगली कामगिरी केली. सर्व शासकीय विभाग तसेच सामाजिक संस्थांनी मिळून वृक्ष लागवड मोहमेत सहभाग घेतला.

यावर्षी जवळपास दहा लाख 13 हजार वृक्ष जिवंत असल्याची नोंद आहे. 2017-18 या वर्षांत राज्याला चार कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ट होते. या वर्षी सर्व यंत्रणेच्या सहकार्याने जिल्ह्यात 29 लाख 96 हजार वृक्ष लागवड करण्यात आली. 2018-19 या वर्षांत राज्याला 13 कोटीचे तर जिल्ह्यात 60 लाख 89 हजार वृक्ष लागवड करण्यात आली. 2019-20 मध्ये राज्याचे उदिष्ट 33 कोटी होते. यात जिल्ह्याचा वाटा एक कोटी 33 लाख वृक्ष लागवडीचा होता. सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषद, महसूल विभाग, कृषी विभाग आदी अनेक शासकीय विभाग तसेच शाळा,महाविद्यालय, सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यात आली. चार वर्षांचा विचार केल्यास जवळपास दोन लाख वृक्ष जिवंत असल्याचे आकडे वन विभागाकडे आहेत. या आकड्यावरुन अनेकांच्या मनात शंका आहे. मध्यंतरी वृक्ष लागवड योजनेवरून राजकारणही तापले होते. काही असले तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली आहे. शेवटच्या वर्षी राज्याने उदिष्ट 50 कोटी वृक्ष लागवडीचे होते. मात्र, यावर्षी फेब्रुवारीपासून कोरोनाचे संकट आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. या अडचणीमुळे यंदा या महत्वाकांक्षी योजनेला खीळ बसण्याची शक्‍यता आहे.

 वर्ष-      राज्य               जिल्हा                      जिवंत
2016    दोन कोटी    16.17लाख           10लाख13हजार
2017    चार कोटी     29लाख96हजार    18लाख11हजार
2018-   13कोटी      60लाख89हजार   39लाख90हजार
2019-    33कोटी     एक कोटी33लाख   एक कोटी 24लाख

यंदा पाचवे वर्ष
2016 या वर्षांत योजना सुरू करण्यात आली. राज्यात पहिल्या वर्षी दोन कोटी, दुसऱ्या वर्षी चार कोटी, तिसऱ्या वर्षी 13 कोटी, चवथ्या वर्षी 33 कोटी तर यंदा 50 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन होते. मात्र, अखेरच्या वर्षांत या महत्वाकांक्षी योजनेला खीळ बसण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात विशेष काम
गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात वनविभागाच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या. यवतमाळात ऑक्‍सिजन पार्क, जांब पार्क हे दोन महत्वाचे प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. याशिवाय, दिग्रस, नेर, दारव्हा या भागातही कुठे नक्षत्र वन तर कुठ अन्य प्रकल्प हाती घेतले आहेत. याठिकाणी दिलेल्या उदिष्टातून वृक्ष लागवड करण्यात आली. यावर्षी जांब पार्क येथे बाबूंची रोपे लावण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com