नागपूर - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह लावता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख व विचारवंत मा. गो. वैद्य यांनी तीन राज्यांच्या निवडणुकीचे विश्लेषण केले.
गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपच्या आयटी सेलद्वारे, तसेच संघ परिवारातून टीकेची झोड उठविली जात होती. त्यांच्यावर उपहासात्मक व चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जात होत्या. तसेच, त्यांच्या नेतृत्वाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर वैद्य यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मा. गो. वैद्य म्हणाले, की कॉंग्रेसला मेहनत करणारा नेता मिळाला आहे. ही कॉंग्रेससाठी चांगली गोष्ट आहे. लोकशाहीत दोन प्रमुख पक्ष प्रबळ राहण्याची आवश्यकता आहे. एका पक्षाचा प्रभाव हा लोकशाहीसाठी हितकारक नाही. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांमध्ये कॉंग्रेसचा विजय हा लोकशाही सुदृढ असल्याचे लक्षण आहे. एकाच पक्षाची फार काळ सत्ता राहणे योग्य नाही. यातून लोकशाही सबळ होत नाही.
तीन राज्यांमध्ये झालेल्या धक्कादायक पराभवातून भाजपच्या नेत्यांनी धडा घ्यावा काय? असे विचारले असता ते म्हणाले, की मी त्यांना काय सांगणार? अध्यक्ष बदलावा की नाही, ही भाजपची अंतर्गत बाब आहे. याबद्दल मी काही बोलणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
|