परतीच्या पावसाने मोडले कंबरडे 

हिंगणा ः परतीच्या पावसामुळे गळलेला संत्रा.
हिंगणा ः परतीच्या पावसामुळे गळलेला संत्रा.

जलालखेडा (जि.नागपूर) :  दिवाळी सणाला प्रारंभ होताच व सतत दोन-तीन दिवस अवकाळी पावसाने नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर, सणासुदीच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे. यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे दिवाळी तर दुसरीकडे पिकांचे नुकसान, यामुळे बळीराजा हातात आलेले पीक, तोंडचा घास हरवल्याने हवालदिल झाला आहे. झालेल्या पिकांचे नुकसान लक्षात घेता, शासनाने तलाठ्यांमार्फत सर्वेक्षण करून ताबडतोब आर्थिक मदत करावी, अशी मागणी वसंत चांडक व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
धनत्रयोदशीपासून दिवाळीचा सण सुरू होतोच व यावर्षी तेव्हापासून अवकाळी पाऊसही सुरु झाला. दिवाळीच्या दिवशी तर नरखेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने शेतात असलेल्या उभ्या कपाशी, सोयाबीन, तूर व इतर पिकांबरोबर संत्रा व मोसंबी या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन तर शेतकऱ्यांच्या घरी येणारच होते, पण या पावसाने या पिकाची सर्वांत जास्त हानी झाली. शेतात पाणी थांबल्यामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. 
जलालखेडा व भिष्णूर जिल्हा परिषदेतील गावांना पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांची नासाडी तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोंगून झालेले सोयाबीन शेतात पडून आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. कापूस पिकाची लागवड या वर्षात सर्वात जास्त करण्यात आली आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सतत पडलेल्या पावसामुळे आधीच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापसाचा पहिला बहार नाहीसा झाला आहे. यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात येणारा कापूस अद्याप शेतकऱ्यांच्या घरी आलेला नाही. उन्हाळ्यात अधिकचे तापमान तसेच पाण्याअभावी संत्रा व मोसंबीच्या अंबिया बहार पूर्ण नष्ट झाला आहे. तसेच राहिलेला अंबिया व मृग बहाराचे नुकसान या अवकाळी पावसामुळे होत आहे. फळाला गळती लागल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पिकांच्या झालेल्या नुकसानाची शासनाने वेळीच दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब तलाठ्यांमार्फत सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी वसंत चांडक व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com