पाऊस न आल्यास पाणीकपात

Water
Water

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांत १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. महापालिका येत्या सहा जूनपर्यंत पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस न आल्यास पाणीकपातीचा निर्णय घेण्यावर महापालिका ठाम असल्याचे सूत्राने नमूद केले. जलप्रदाय समिती सभापतींनीही यास दुजोरा दिला. दरम्यान, शनिवारी रात्री शहराला पुरवठा करणाऱ्या नवेगाव खैरी येथील पम्पिंग स्टेशनवरील वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक जलकुंभांतील पाण्याच्या पातळीत घट झाली. त्यामुळे निम्म्या शहरात अल्प पाणीपुरवठा होणार आहे.

मागील महिन्यापासून शहरावर जलसंकट घोंगावत आहे. महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात १० जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे नमूद करीत नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केल्याने जलसंकटाची तीव्रता वाढली. हवामान खात्याने या आठवड्यात पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. काल, शहरासह ग्रामीणमध्येही पावसाने हजेरी लावली. परंतु, शहराची तहान भागविण्यासाठी हा पाऊस अल्प आहे. त्यामुळे महापालिकेला आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. १० जूनपर्यंतच पाणीसाठा असल्याने महापालिकेने त्यानंतरच्या नियोजनासाठीही प्रयत्न सुरू केले आहे. ६ जूनपर्यंत पावसाची प्रतीक्षा करण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका पाणीकपातीचा निर्णय घेण्याची शक्‍यता मनपातील जलप्रदाय विभागातील उच्चपदस्थ सूत्राने व्यक्त केली. ६ जूनला महापालिका पाण्यासंदर्भातील स्थितीचा आढावा घेणार असून, गंभीर स्थितीत पाणीकपातीशिवाय पर्याय नसल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाणीकपात न करण्याचा निर्णय मनपातील सत्ताधाऱ्यांनी घेतला होता. लोकसभा निवडणूक होताच आता महापालिकेने पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली. अवैध नळजोडणी बंद केली असून, आतापर्यंत दीडशेवर टुल्लूपंप जप्त करण्यात आले. पाणीबचतीचाच हा प्रकार असून पाऊस न आल्यास यापेक्षाही कठोर निर्णय महापालिका घेणार आहे. याशिवाय आपत्कालीन स्थितीत गोरेवाडा जलाशयाचे पाणी वापरण्यात येते. मात्र, येथील पाण्याच्या पातळीतही घट झाली. त्यामुळेही पाणीकपातीच्या निर्णयाशिवाय महापालिकेपुढे पर्याय नसल्याचे सूत्राने व्यक्त केले. 

पाणीचोरट्यांवर नियंत्रणासाठी हेल्पलाइन 
शहरात टुल्लूपंपद्वारे पाणीचोरीचा प्रकार सर्रास सुरू आहे. यावर नियंत्रणासाठी महापालिका हेल्पलाइन सुरू करणार आहे. पाणीचोरी, गळती, बांधकामासाठी पाण्याचा वापर, टॅंकरचे पाणी पळविणे आदी दिसल्यास नागरिकांनी या हेल्पलाइनवर कळविण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. या हेल्पलाइनवरील तक्रारीबाबत जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके पुढाकार घेणार आहे. लवकरच हेल्पलाइनचा क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे. पाणीचोरीवर नियंत्रणासाठी शक्‍य तेवढे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

६ जूनपर्यंत पावसाची प्रतीक्षा आहे. समाधानकारक पाऊस नसल्यास शहरातील पाण्याच्या नियोजनाबाबत बैठक घेऊन कठोर निर्णय घेतला जाईल. पाणीचोरीवर नियंत्रणासाठीही ‘सेव्ह वॉटर हेल्पलाइन’ सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशनमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील जलकुंभांतील पाण्याची पातळी घटली. परिणामी काही वस्त्यांना अल्प पाणीपुरवठा होईल. 
- पिंटू झलके, सभापती, जलप्रदाय समिती, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com