शाळाबाह्य मुलांसाठी शाळांची गुणवत्ता जबाबदार - नंदकुमार

education
education

नागपूर - शाळेची गुणवत्ता चांगली असेल तर मुले शाळा सोडून जात नाही. आणि जावेच लागले तर पूर्वीच्या शाळेची चांगली प्रतिमा मनावर असेल तर तो शाळाबाह्य राहत नाही. त्यामुळे शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होण्यास शाळांची गुणवत्ताच जबाबदार असल्याचे प्रतिपादन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.

नागपूर विभागातील शाळाबाह्य मुलांच्या संख्येसंबंधी शंकरनगर येथील सरस्वती हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत प्राथमिक संचालक गोविंद नांदेडे, उपसंचालक अनिल पारधी, प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राला गुणवत्ताहीन पिढी अधोगामी बनवेल. हा दोष आपल्या आयुष्यावर लावून घेऊ नका. भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे. कुठलीही भाषा ही श्रेष्ठ असते. आपण त्या भाषांना महानतेचा शिक्का लागतो. तो मुलांमध्ये रुजवतोही. त्यामुळे शिक्षण कुठल्या माध्यमात देण्यात येते, हे महत्त्वाचे नसून शिक्षणाची गुणवत्ता किती चांगली आहे, याचे महत्त्व वाढवा. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क देण्यात आला. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूकही करण्यात येते. पण, अनेकदा मुलाच्या परिस्थितीचा हवाला देण्यात येतो. शिक्षणाच्या आड कधीही गरिबी येत नाही. मुले शिकायला आली तर त्यांना शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.

भाषा, गणित आणि विज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. या विषयांची भीती शिक्षकांच्याच मनात असते. हीच भीती ते मुलांकडे हस्तांतरित करतात. त्यामुळे शालेय मुलांना हा विषय नकोसा वाटतो. शिक्षकांनी आवश्‍यक असल्यास शिक्षण विभागाला गणिताच्या प्रशिक्षणाची मागणी करायला हवी. पण, कधीही शिक्षक स्वत:हून अशी मागणी करत नाही. या वेळी संचालक गोविंद नांदेडे, अनिल पारधी यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com