नागपूर - महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता नेमून दिलेली कामे पूर्ण केल्यानंतर तपशील, गोषवाऱ्यासह स्वत: प्रमाणित करून द्यायचा आहे. त्या आधारावरच वेतन काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्देश नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफीक शेख यांनी दिलेत.
नागपूर परिमंडळातील 40 उपविभागीय कार्यालयांमध्ये एकाचवेळी बैठक घेऊन निर्देशाबाबतच्या सूचना कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठ्याची गुणवत्ता कायम राखणे, वीजग्राहकांना प्रत्यक्ष भेटून बिल भरण्यासाठी प्रवृत्त करणे, बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढविणे, संख्या वाढविण्याची जबाबदारी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. त्या आधारेच कामाचा घोषवारा स्वत: प्रमाणित करून द्यायचा आहे.
मुख्य अभियंता शेख, अधीक्षक अभियंता मनीष वाठ, नारायण आमझरे, सुनील देशपांडे यांच्यासह कार्यकारी अभियंते बैठकीला उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून वीजपुरवठा खंडित होणार नाही आणि तो झाल्यास त्वरित दुरुस्तीसाठी उपलब्ध राहावे, थकबाकी कमी करावी, वीजबिलांचा भरणा केलेल्या ग्राहकांची संख्या वाढवावी, तात्पुरता वीजपुरवठा खंडित केलेल्यांची योग्य नोंद ठेवावी, पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीजपुरवठा जोडून द्यावा, नवप्रकाश योजनेतील संभाव्य लाभार्थ्याला त्याच्या देयकासह विनंतीपत्र जनमित्राने स्वत: त्याच्या पत्त्यावर पोचते करावे, अनधिकृत वीजपुरवठा सुरू असल्यास संबंधितांवर कार्यवाही करावी, रोहित्र बिघाडाच्या घटनांचे विश्लेषण करावे, प्रत्येक जनमित्राने दररोज किमान एका कृषिपंपाची तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा, साडेसात एचपीपेक्षा अधिकच्या कृषिपंपांना मीटर बसविणे आणि अपघातविरहीत सेवा द्यावी आदी सूचना यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्या.
ऑइल चोरी करणाऱ्यांवर गुन्हे
रोहित्र फोडून ऑइल चोरणाऱ्यांविरोधात महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिस ठाण्यत गुन्हे दाखल करून चोरट्यांना हुडकून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. नादुरुस्त रोहित्र त्वरित दुरुस्त किंवा बदली करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. रामटेक परिसरात रोहित्रातील ऑइल चोरीच्या घटना वाढल्या असून या प्रकरणांमध्ये महावितरणने पोलिसांत गुन्हे दाखल केले आहे.
|