का आली ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची वेळ, वाचा...

Administrators will be appointed on district Gram Panchayats
Administrators will be appointed on district Gram Panchayats

यवतमाळ : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने तसेच कोरोनाच्या संकटात निवडणुका घेणे शक्‍य नसल्याने ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीच्या स्थानिक नेत्यांमधील समन्वयातून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, हालचालींना वेग आला आहे.

महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या ग्रामपंचायातींची मुदत एप्रिल ते जून महिन्यात संपणार होती. परंतु, आता कोरोनाच्या संकटामुळे राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका सध्या स्थगित केल्या आहेत. या पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायातींचा कार्यकाळ संपल्याने आता यवतमाळ जिल्ह्यातील 461 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.

प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 1958 नुसार ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्‍यातील 24, झरीमांजरी 14, दिग्रस 22, राळेगाव 28, उमरखेड 30, केळापूर 26, बाभुळगाव 25, वणी 40, पुसद 36, मारेगाव 20, यवतमाळ 40, दारव्हा 30, कळंब 30, महागाव 38, नेर 24 तसेच आर्णी तालुक्‍यातील 34 ग्रामपंचायतींवर तसेच याशिवाय सप्टेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी समन्वय करून प्रशासक नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अशी होईल प्रक्रिया

पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सोळाही तालुक्‍यातील शिवसेना, कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका प्रमुख प्रत्येक तालुक्‍यातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन प्रशासकांचे नाव सुचविणार आहे. ही नावे जिल्हा समितीजवळ येईल. यात जिल्हा समितीचे शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, विश्वास नांदेकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग प्रशासकांची यादी फायनल करून ती पालकमंत्र्यांकडे पाठवतील. पालकमंत्री महोदय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यादीतील नावांची शिफारस करणार आहेत. एखाद्या नावाबाबत एकमत न झाल्यास महाविकास आघाडी जिल्हा समन्वय समितीकडे संबंधित नाव पाठवून वादाचा निपटारा करेल.

योग्य व्यक्तींची निवड होईल

कोरोना संकटात ग्रामपंचायतीचे कार्य व्यवस्थित पार पडावे यासाठी आम्ही योग्य व्यक्तींची प्रशासक म्हणून निवड करण्यासाठी शिफारस करणार आहोत. योग्य व्यक्तीच्या हातात कारभार राहावा तसेच ग्रामपंचायतीचे कार्य विस्कळीत होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे आघाडी सरकारमधील शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना, पदाधिका-यांना विश्वासात घेऊन प्रशासकांची अंतिम शिफारस यादी सुपूर्द करणार आहोत.
पराग पिंगळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना यवतमाळ

संपादित : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com