वादळ आले धाऊन, छप्पर गेले उडून! जनावरे, शेतमालासह अन्नधान्याचे नुकसान

NGP
NGP

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरोना विषाणूच्या संकटातच वर्धा नदीपट्ट्यातील दहा गावांना रविवारी (ता. 10) सकाळी आलेल्या वादळाचा तडाखा बसला. अनेकांच्या घरांची छ्परे उडाली. पोवनी येथे वीज पडून गाय ठार झाली, तर गोयेगावात शॉक लागून पाच जनावरे दगावली. चिमूर तालुक्‍यातील नेरी येथे गारपिटीने 210 चिमण्या मृत्यूमुखी पडल्या. जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला.
रविवारी पहाटे सहा वाजतापासून वातावरण बदलले. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. राजुरा तालुक्‍यातील गोवरी, पोवनी, चिंचोली(खू), गोयेगाव, कढोली, चार्ली, निर्ली, धिडशी, मानोली आणि बाबापूर ही गावे वर्धा नदीच्या पट्यातील आहेत. या गावांना वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. चिंचोली(खू) येथील किसन बलकी यांच्या घराचे छप्पर उडून गेले. त्यांच्या घरात असलेला 40 क्‍विंटल कापूस पूर्ण भिजला. घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. केशव काळे यांचा शेतातील गोठा वादळाने उडून गेला. गोवरी येथील भास्कर लोहे यांच्या शेतातील गोठ्याचे वादळाने नुकसान झाले. कढोली(बू) येथे वादळाने अनेक कुटुंबांची अक्षरशः दाणादाण उडाली. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने कढोली (बू.) येथील गावकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. कढोली येथील प्रभाकर भोयर, परशुराम राऊत, लक्ष्मण हासे, संतोष मुक्‍के, चांगदेव खंगार, रामदास बोबडे यांच्या घरावरील टीनपत्रे या वादळाने उडाली. काही कळायच्या आत कुटुंबे उघड्यावर आली. सुदैवाने यात  जीवितहानी झाली नाही. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेल्यामुळे घरातील अन्नधान्य ओले झाले. कढोली गावातील अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.  अन्नधान्य ओले झाले आहे. या गावातील इलेक्‍ट्रिक पोलसुद्धा वाकले आहेत. अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. चंद्रपूर शहरातही सकाळी साडेसहा वाजता पावसाला सुरूवात झाली. जवळपास अर्धा तास पाऊस सुरू होता. सावली, जिवती, बल्लारपूरसह अन्य तालुक्‍यांतही पाऊस झाला.
वीज पडून गाय ठार
राजुरा तालुक्‍यात सकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पोवनी येथील भूषण कावळे यांच्या मालकीची गाय शेतात चरत होती. तेव्हाच अचानक वीज कोसळली. त्यात गाय ठार झाली. त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सविस्तर वाचा - शू...आमच्या गावात तुम्हाला प्रवेश नाही बरं का!
गोयेगावात शॉक लागून पाच जनावरे मृत्यूमुखी
गोयेगाव परिसराला वादळाचा फटका बसला. विजेचे खांब वाकून काही ठिकाणी जिवंत वीज तारा तुटून खाली पडल्या. दुपारच्या सुमारास येथील एक शेतकरी शेतात जाण्यास निघाले. तेव्हा त्यांना पाच जनावरे मृत अवस्थेत दिसली. त्यांनी लगेच या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. हरिदास गौरकर यांच्या मालकीचे दोन बैल, विनोद पडवेकर यांच्या मालकीचा एक बैल, विलास मुसळे यांच्या मालकीची एक गाय, तर पुरुषोत्तम वनकर यांच्याही मालकीची 1 गाय दगावली. या घटनेचा पंचनामा तलाठी सुरेंद्र चिडे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com