अमरावती - शाळेच्या शारीरिक शिक्षकांचे दुर्लक्ष आणि पालकांचा पाल्यांप्रती असलेला अतिआत्मविश्वास कसा जीवघेणा ठरू शकतो, याचा प्रत्यय जिल्हास्तर शालेय जलतरण स्पर्धेच्यावेळी आला. भविष्यात क्रीडाक्षेत्राचे गुण मिळतील, या आशेने जलतरण तलावात उड्या घेणारे 15 विद्यार्थी गटांगळ्या खात असताना त्यांना दक्ष प्रशिक्षकांनी वाचविले.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे सोमवारी (ता. 3) हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावावर जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा झाली. त्यात विविध वयोगटांतून वेगवेगळ्या प्रकारांत साडेतीनशे जलतरणपटू सहभागी झाले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या क्रीडाप्रकारात शाळेतील खेळाडू सहभागी होतात, त्यांनी त्या खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे वा नाही, याची खात्री शाळांनी करून घेणे आवश्यक आहे; परंतु असे न करता स्पर्धेत काही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. त्या मुलांच्या पालकांनीसुद्धा याचा विचार केला नाही.
मैदानी खेळात खेळाडू अल्पप्रशिक्षित असला, तरी थोडावेळ तो तग धरू शकतो; पण तोच प्रकार जलतरणाचा असेल आणि सलग दोन वर्षांचा सराव केला असेल, तरच तो स्पर्धेत तग धरू शकतो. परंतु, ज्यांनी उन्हाळ्यात महिना दोन महिने जलतरणाचे धडे घेतले आहेत, असे 14 व 17 वर्षे वयोगटातील तीस ते पस्तीस खेळाडू या जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले होते. त्यापैकी बहुतांश खेळाडूंनी 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकार निवडला. त्यांपैकी 15 खेळाडू पंचवीस मीटर अंतरसुद्धा कापू शकले नाहीत. वीस फूट खोल पाण्यात उड्या घेताच त्यांनी गटांगळ्या खाल्ल्या. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे जीवरक्षक तेथे तैनात असल्याने या खेळाडूंचा जीव वाचू शकला. थोडे दुर्लक्ष झाले असते, तर गंभीर घटना घडली असती. याबाबत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
शाळांना समज देण्याची गरज
जलतरण स्पर्धेत प्रशिक्षित खेळाडूंचाच सहभाग असावा. अप्रशिक्षितांना अशा ठिकाणी पाठविणे गंभीर बाब आहे. त्यामुळे ज्यांनी अप्रशिक्षित खेळाडूंना या स्पर्धेसाठी पाठविले, त्या शाळांना समज देण्याची गरज आहे, असे मत स्पर्धास्थळी हजर पालकांनी व्यक्त केले.
|