खोटारड्या भाजप सरकारला सत्तेखाली खेचा; कॉंग्रेस नेत्यांचे आवाहन

खोटारड्या भाजप सरकारला सत्तेखाली खेचा; कॉंग्रेस नेत्यांचे आवाहन

नागपूर -  गेल्या साडेचार वर्षांत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवून जनतेला महागाईत भरडले. आज प्रत्येक व्यक्ती साडेचार वर्षांपूर्वी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करीत असून कॉंग्रेसच हवी अशी आशा बाळगत आहे. रेटून खोटे बोलून फसवणूक करणाऱ्या अशा फेकू, खोटारड्या सरकारला सत्तेखाली खेचा, असे आवाहन करीत आज कॉंग्रेस नेत्यांनी जनतेला केले. 

दीक्षाभूमी येथून सुरू झालेल्या कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप आज झिंगाबाई टाकळी येथील पोलिस लॉन मैदानावर झाला. या समारोप समारंभातून कॉंग्रेसच्या सर्वच वक्‍त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेताना सरकारच्या धोरणांवरही टीका केली. व्यासपीठावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अ. भा. कॉंग्रेसचे महासचिव अविनाश पांडे, माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी आशीष दुवा, आमदार सुनील केदार, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार आशीष देशमुख, शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल कोटेचा, ऍड. अभिजित वंजारी, प्रा. बबनराव तायवाडे, अनंत घारड, विशाल मुत्तेमवार, प्रफुल्ल गुडधे पाटील, अतुल लोंढे, त्रिशरण सहारे आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस सत्तेत आलीच पाहिजे, अशी तयारी करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तीन राज्ये गेल्यानंतर भाजप नेत्यांची "उखाड देंगे, फेक देगें' अशी भाषा सुरू झाली असून त्यांच्यावर आता जनतेनेच "सर्जिकल स्ट्राइक' करावा, असेही ते म्हणाले. "हवा का मामुली झोका आंधी नही हो सकता, चरखा चलानेसे कोई गांधी नही हो सकता', असे नमूद करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला. भाजपची उलटगिणती सुरू झाली असून "जुमल्याचे' सरकार संपुष्टात येत असल्याचे संकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीने दिल्याचे माजी केंद्रीय मंत्री मुत्तेमवार म्हणाले. शहराचा सत्यानाश केल्याचे नमूद करीत त्यांनी मिहानमधील 50 हजार रोजगारांच्या आश्‍वासनाचे काय झाले? असा प्रश्‍न उपस्थित केला. खोटे जास्त चालत नाही, वारंवार लोकांची फसवणूक कुणीही करू शकत नाही, असेही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी साडेचार वर्षांत या सरकारने थापा मारण्याशिवाय काहीही केले नाही. अशा थापाड्यांना खाली खेचा, असे आवाहन केले. संपूर्ण राज्य खोदून ठेवले, कर्ज वाढविले, गृहिणीचे बजेट बिघडविल्याची टीकाही त्यांनी सरकारवर केली. विकास ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अविनाश पांडे, नाना पटोले यांचीही भाषणे झाली. यावेळी अनेकांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

साहित्यिकांची मुस्कटदाबी - खासदार चव्हाण 
यवतमाळ येथील साहित्य संमेलनात उद्‌घाटक नयनतारा सहगल यांचे भाषण सरकारविरोधात असल्याचे समजताच त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले. साहित्यिकांचीही तोंड बंद करण्याचे काम हे सरकार करीत आहेत. ही लोकशाहीची विटंबना असल्याची टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केली. 

विजयासाठी "मी'पणा विसरा - पांडे 
राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे असेल तर "मी'पण विसरून एकोप्याने कामे करा, असा सल्ला देतानाच अविनाश पांडे यांनी स्वकीयांना चिमटाही काढला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटायला हवी, अशी टीका केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com