कोरची तालुक्‍यातील तीस ग्रामपंचायतींना ऑनलाइनची प्रतीक्षा

file photo
file photo

कोरची, : 15 ऑगस्ट 1992 मध्ये कुरखेडा तालुक्‍यातून विभाजन झालेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील कोरची तालुक्‍यात 30 ग्रामपंचायती असून 2001 च्या जनगणनेनुसार 40 हजार 736 एवढी या तालुक्‍याची लोकसंख्या आहे. संग्राम योजनेअंतर्गत राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला संगणक व संगणकचालक उपलब्ध करून दिला. परंतु, या तालुक्‍यातील संपूर्ण 30 ग्रामपंचायती अद्याप ऑनलाइनच्या प्रतीक्षेत आहेत.
ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी नसल्याने शासनाची ही योजना फोल ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे 30 ते 40 किमी अंतरावरून तालुकास्थळावर जाऊन नागरिकांना स्वत:चे काम करावे लागत आहे. 1 मे 2011 रोजी राज्य शासनाने संग्राम योजना सुरू केली. शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेले विविध शासकीय प्रमाणपत्र ग्रामपातळीवरच उपलब्ध करून देण्याचा हेतू समोर ठेवला होता. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न, खर्च, योजनेची माहिती शासनाने केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती सोपी व्हावी, यासाठी राज्य शासनाने लाखो रुपये खर्च करून प्रत्येक ग्रामपंचायतीला संगणक, प्रिंटर, यूपीएस उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर पंचायत समिती व जिल्हा स्थळावरसुद्धा संगणक उपलब्ध करून देण्यात आले. संग्राम योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची 19 प्रमाणपत्रे मिळण्याची सोय आहे. अनेक तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी मिळत नसल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे. कोरची तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत डोंगरावर वसला आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बाराही महिने कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. कोरची तालुका हा घनदाट जंगलाने व्यापलेला असून 40 ते 45 किमी अंतरावर आदिवासी लोकांची गावे वसलेली आहेत. शासनाने ग्रामपंचायतींना कनेक्‍टिव्हिटी पुरविण्यासाठी पावले उचलली असली तरी सद्यस्थितीत या तालुक्‍यातील तीसही ग्रामपंचायती ऑफलाइन आहेत. त्यामुळे ग्रामसेवकाला व नागरिकांना अजूनही जुन्याच पद्धतीने देवाण-घेवाण करून आपली कामे करून घ्यावी लागत आहेत.
ऑफलाइन कामकाज
दुर्गम भागातील ग्रामपंचायतीला इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी पुरविताना शासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायती अजूनही ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करू शकत नाहीत. एखादी माहिती वरिष्ठ स्तरावर पाठवायची असल्यास ग्रामसेवकाला तालुक्‍यास्थळी येऊन किंवा कुरखेड्यासारख्या कनेक्‍टिव्हिटी असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काम करावे लागत आहे. यामध्ये पैसा व श्रम यांचा अपव्यय होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com