नागपूर - दमदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असतानाच, यवतमाळ जिल्ह्यात नाल्याला आलेल्या पुरामुळे तिघांना जलसमाधी मिळाल्याची घटना आज घडली; तर गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक भागांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
यवतमाळ जिल्ह्यात नदीनाल्यांना आलेल्या पुरात तिघांना जलसमाधी मिळाली असून, एकाचा मृतदेह सापडला आहे; तर दोघांच्या मृतदेहांचा शोध घेणे सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वणी तालुक्यात सुनील भोयर हा युवक एका पुलावरून वाढते पाणी पाहत असताना पाय निसटून पाण्यात पडला आणि वाहून गेला. त्याच्या मृतदेहाचा शोध घेणे सुरू होते. पुसद तालुक्यातील बान्शी येथेही पुरात रविवारी सायंकाळी पाच वाजतादरम्यान विनोद चिळाल आणि विकास आगलावे वाहून गेले. रात्री साडेसातपर्यंत विनोदचा मृतदेह हाती लागला.
पावसाचा धुमाकूळ
- गडचिरोली आणि यवतमाळमध्ये नद्यांना पूर
- पुसदमध्ये शंभरावर घरांना पुराचा वेढा
- गोंदिया तालुक्यात 95.34 मि.मी. पाऊस
- अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे नुकसान
|