चिखलदरा - पुनर्वसनाच्या प्रश्नावरून केलपानी गावात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाच्या जवानांवर हल्ला करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी वनविभाग तसेच पोलिसांच्या मोहिमेला आता सुरवात झाली आहे. एकूण 137 आंदोलनकर्त्यांवर चिखलदरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मंगळवारी (ता. 22) ही घटना केलपानी गावात घडली होती. दरम्यान, हा प्रश्न जागतिक व्यासपीठावर नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
पुनर्वसित आठ गावांतील नागरिक आपल्या विविध मागण्यांसाठी केलपानीत आंदोलन करीत असतानाच 22 जानेवारीला वनविभाग तसेच पोलिस खात्यासोबत त्यांची चर्चा सुरू असताना हा हिंसाचार झाला. या घटनेत राज्य राखीव दलाच्या जवानांसह पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याने सुमारे 45 जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. परंतु सर्वजण धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, सुमारे दीडशे हेक्टर वनाला आग लावून आंदोलकांनी जंगलात पळ काढला होता.
युनोकडे निवेदन
दरम्यान, मेळघाटातील आदिवासींच्या पुनर्वसनाच्या मुद्द्याला जागतिक स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मेळघाट इलाखा पारंपरिक ग्रामसभा संघटनेतर्फे गुरुवारी (ता. 24) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनाची प्रत थेट संयुक्त राष्ट्र संघातील आदिवासी प्रतिनिधी ऍड. लालसू नागोटी यांनाही पाठविण्यात आली आहे.
मेळघाट व्याघ्रप्रकल्पात आदिवासींवर अमानवीय अत्याचार होत आहेत. त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन चालू आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे, महिलांना जंगलाबाहेर बळजबरीने काढले आहे, दडपशाहीचा प्रयत्न केला जात आहे, असे खळबळजनक आरोप संघटनेने या निवेदनात केले आहेत. अध्यक्ष मन्नालाल दारसिंबे यांची त्यावर स्वाक्षरी आहे.
|