अमरावती : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी सप, बसप यांच्यासारख्या समविचारी पक्षांना सोबत घेतले आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याची आमची तयारी आहे, देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आहे, यातून प्रसारमाध्यमेही सुटली नाहीत. सरकार विरोधात बोललं की देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्या जातो, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
येथील नेहरू मैदानात आयोजित परिवर्तन यात्रा जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार ख्वाजा बेग, प्रकाश गजभिये, माजी आमदार सुलभा खोडके, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, दिनेश बूब, सुनील वऱ्हाडे, राजू महल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक पातळीवरील समस्या व प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी सत्तापरिवर्तन गरजेचे असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. गेल्या साडेचार वर्षात विदर्भातील सिंचन अनुशेष, कापूस, संत्रा, सोयाबीन उद्योग बंद पडले. शेतकरी आत्महत्या वाढल्या, त्या थांबविण्यासाठी हे सरकार उलथवण्यासाठी साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस सरकार फसवणूक करणारे सरकार असल्याची टीका केली.
भुजबळांचे सावध राहण्याचे आवाहन
छगन भुजबळ यांनी "जुमलेबाज' असा उल्लेख करूनच भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले, मला अटक का केली गेली ते अजूनही कळले नाही. निवडणूक आली की राममंदिर समोर केल्या जाते. त्यांना मंदिर बांधायचे नसून धर्माचा धंदा करायचा आहे. निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी मंडळाला 200 कोटींचा निधी देण्याचे आश्वासन देतात, जातीय तेढ निर्माण करतात, दंगली घडवण्याचे प्रयत्न करतात, तेव्हा तुम्ही सावध राहा, असे आवाहन त्यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.