Video : आमच्या तर जीवनाचाच भाजीपाला झाला साहेब...

farmer
farmer

चांदूररेल्वे (जि.अमरावती) : अमरावती शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे तालुक्यातील भाजी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. भाजीपाला उत्पादकांच्या घरोघरी भाज्यांचे ढीग लागले आहेत. अनेक शेतकरी हा भाजीपाला गुरांना टाकत आहेत. जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान एकट्या बासलापूर येथील शेतकऱ्यांचे झाले असल्याचे ते सांगतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनाचाच भाजीपाला झाला आहे.

चांदूररेल्वे अमरावती रोडवर असलेल्या बासलापूर हे गाव भाजीपाला उत्पादक म्हणून संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे. या गावातील प्रत्येक शेतकरी हा भाजीपाल्याचे उत्पन्न घेतो. संपूर्ण जिल्ह्यात या गावातून कांदा, ढेमसे, पालक, सांबार, बरबटी, गवार आदी अनेक भाज्यांचे उत्पन्न घेतले जाते. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत एकरभर जागेत दोन ते तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न हे शेतकरी घेत असतात. परंतु, गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात त्यांच्या उत्पन्नात घट आली आहे, त्यातच आता अमरावतीची मंडई बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे दररोज निघणारा शेतमाल कुठे विकायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

झाडावरील माल तोडला नाही तर संपूर्ण झाड खराब होते, तर तोडल्यावर बाजारपेठ बंद असल्याने माल घरीच पडून राहत आहे. तोडणी, फवारणी व वाहतुकीचा खर्च मात्र करावा लागत आहे. लॉकडाउनमुळे लग्नकार्य बंद आहेत. हॉटेल्स, खानावळी सर्वच बंद असल्याने उत्पन्न जास्त आणि मागणी कमी, अशी स्थिती झाली आहे. दुसरीकडे अमरावती भाजीमंडी बंद असल्याने तेथील ग्राहकांना मात्र दुप्पट भावाने भाजीपाला घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. स्थानिक बाजारपेठेत या मालाला योग्य भाव मिळत नसून वाहतूक भाडेही निघत नसल्याने अनेकांनी आपला भाजीपाल्याचा माल गुरांना टाकला आहे.

लॉकडाउन गरजेचे पण जगायचे कसे?
सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाउन हे गरजेचेच, पण अशा स्थितीत आम्ही कुणाकडे पाहायचे. चार महिन्यांपूर्वी होते नोहते पैसे लावून बरबटीची लागवड केली, पण आज लग्न, हॉटेल यासह अमरावती रेड झोनमध्ये आल्याने संपूर्ण व्यापार ठप्प झालेला आहे. परिणामी गावातील घराघरांत भाज्यांचे ढीग लागत असल्याची माहिती बरबटी उत्पादक शेतकरी अंकुश बोबडे यांनी दिली.

गावातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
गावात प्रत्येकाने भाजीपाल्याची लागवड केली आहे. एकरी एक ते दोन लाख, असे उत्पन्न सरासरी दरवर्षी प्रत्येकास होत असते. परंतु सध्याच्या लॉकडाउनमुळे शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी राजू चौधरी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी
आज बरबिटी, गवार, ढेमस आदी भाज्या तोडण्याचा दररोज हा १० ते २० रुपये किलोप्रमाणे द्यावा लागत आहे. इतर खर्च धरून घरीच ती २० ते ३० रुपये किलो पडत असून, चांदूरच्या बाजारात मात्र व्यापारी १० रुपये किलोने भाजी मागत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी मंगेश मोने यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com