विहिंपमधील ‘भाऊबंदकी’ संपवेल का ‘ऋतंबरा’?

sadhvi rutumbara
sadhvi rutumbara

नागपूर - रामजन्मभूमीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना, रामजन्मभूमीचा यज्ञ पूर्णप्रज्वलित करण्याचा ध्यास विश्‍व हिंदू परिषदेने घेतला आहे. त्यादृष्टीने २५ नोव्हेंबरला नागपुरात होणाऱ्या सभेत ‘फायरब्रॅण्ड’ वक्‍त्या साध्वी ऋतंभरा यांचे मार्गदर्शन होणार आहे. मात्र, प्रवीण तोगडियांच्या गच्छंतीनंतर दुभंगलेल्या विहिंपमधील ‘भाऊबंदकी’ साध्वी ऋतंबरा संपवू शकतील काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

प्रवीण तोगडिया आणि स्व. अशोक सिंघल यांनी विहिंपला आक्रमक आणि कट्टर हिंदुत्ववादाचा चेहरा दिला. तोगडिया निघून गेल्यानंतर विहिंपची धुरा त्यातुलनेने मवाळ समजले जाणारे विष्णुजी कोकजे यांच्याकडे सोपवली गेली. गेले चार वर्षांत संघाला विश्वासात न घेता तोगडियांनी  केलेल्या खुरापती आणि त्यामुळे मोदींविरोधात कोणाचीही टीका खपवून घेण्याची संघपरिवाराच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.   

जून महिन्यात प्रवीण तोगडीया यांनी विश्‍व हिंदू परिषदेला सोडचिठ्ठी दिली आणि ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ नावाने वेगळी चूल मांडली. मात्र, तोगडीयांच्या या निर्णयानंतर अनेक सक्रिय चेहऱ्यांनी विहिंपला ‘राम राम’ ठोकला. कारण गेल्या तीन दशकांत प्रवीण तोगडियांच्या मार्गदर्शनात पिढ्या तयार झाल्या आहेत. शिवाय तोगडियांसारख्या उग्र चेहऱ्याचा त्याग करून, विष्णू कोकजे यांच्या सौम्य स्वभावाच्या व्यक्‍तीसोबत काम करणे अनेकांच्या पसंतीस पडले नाही. त्यामुळे आक्रमक वृत्तीच्या तरुणांचा ओढा विहिंपची साथ सोडून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेकडे वळला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर येत्या २५ तारखेला होत असलेली सभा पहिलीच असल्याने किमान रामजन्मभूमीच्या मुद्यासाठी तरी सर्व कार्यकर्ते एकत्र येतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी विहिंप सोडून गेलेला कार्यकर्ता स्वत: परतला तर त्याचे स्वागत करण्याची भूमिका विहिंपच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. तर रामजन्मभूमीच्या मुद्यावर स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने घेतला आहे. 

 प्रवीणभाईंनी विहिंपला सोडचिठ्ठी दिली, तेव्हाच आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता आमचे स्वतंत्र काम उभे झाले आहे. त्यामुळे राममंदिराच्या मुद्याच्या बाबतीतही आम्ही प्रवीण तोगडियांच्या आदेशानंतर निर्णय घेऊ.  
- जयेंद्र ठाकूर, नागपूर जिल्हाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद.

संशय कायम... 
विश्‍व हिंदू परिषदेत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी रामजन्मभूमी म्हणजे अस्मितेचा मुद्दा आहे. साध्वी ऋतंबरा यांच्या मार्गदर्शनाने नेहमीच रामभक्‍तांमध्ये चैतन्य निर्माण होते. त्यामुळे व्यक्‍तीनिष्ठेत आणि कार्यनिष्ठेच्या वादात अडकलेली विहिंपमधील युवापिढी स्वत:मधली भाऊबंदकी संपवून विशाल हुंकार सभेत सहभागी होईल का? याबाबत अद्यापही साशंकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com