घसा कोरडा,धरणे तळाला

घसा कोरडा,धरणे तळाला

अमरावती : पश्‍चिम विदर्भातील पाणीसमस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असतानाच आता धरणांतील जलसाठाही संपुष्टात येऊ लागला आहे. दोन मोठ्या धरणांसह पाच मध्यम धरणे कोरडीठण्ण पडली असून येत्या सप्ताहात आणखी पाच धरणांतील साठा संपणार आहे. बुलडाणासह वाशीम व अकोला जिल्ह्यास याची सर्वाधिक झळ बसणार आहे.
बुलडाण्यातील खडकपूर्णा व पेनटाकळी या मोठ्या धरणातील साठा संपला असतानाच अकोल्यातील काटेपूर्णा व नळगंगा अखेरच्या घटका मोजत आहे. या दोन्ही धरणांत अनुक्रमे 13.45 व 6.12 दलघमी जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळच्या अरुणावतीमधील साठा झपाट्याने संपत असून सद्यस्थितीत 24.13 दलघमी इतकाच साठा शिल्लक आहे. अमरावती विभागात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ सोसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सध्या मोठे, मध्यम व लघू अशा एकूण 105 प्रकल्पांत 23.87 दलघमी (4.47 टक्के) जलसाठा आहे. बुलडाण्यातील मस व कोराडी या मध्यम धरणातील साठा संपला असून पलढग, मन, तोरणा, उतावळी या धरणांची वाटचाल शून्याकडे सुरू आहे. या सप्ताहात त्यातील साठा संपणार आहे. त्यामुळे शून्यसाठा असलेल्या धरणांची संख्या सहावर पोहोचेल.
त्याखालोखाल वाशीम जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यातील सोनल धरण कोरडे पडले आहे. तर एकबुर्जीमधील साठा या सप्ताहात संपण्याच्या बेतात आहे. त्यात 1.76 दलघमी साठा आहे. अडाणवर भिस्त असली तरी त्यातीलही साठा 9.42 दलघमी इतकाच आहे.
अकोला जिल्ह्यातीलही स्थिती भीषणतेकडे वाटचाल करीत आहे. निर्गुणा व घुंगशीमधील साठा संपला असून उमा या आठवड्यात तर मोर्णा पंधरवाड्यात कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे.
अमरावती जिल्ह्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पात मोजकाच साठा शिल्लक आहे. 9.82 दलघमी साठा असला तरी मे व जून महिन्याचा ताण त्यावर आहे. तर शहानूरमधील 17.50, चंद्रभागामधील 15.33 व सापनमधील 18.46 दलघमीवरील ताण वाढला आहे.
यवतमाळमध्ये बोरगाव धरणाचे मार्गक्रमण झपाट्याने शून्याकडे सुरू आहे. 0.83 दलघमी इतकाच साठा त्यामध्ये सध्या आहे. तर आगामी पंधरवड्यात सायखेडा, वाघाडी व नवरगाव यांचा क्रमांक लागणार आहे.
लघू प्रकल्प कोरडे
पश्‍चिम विदर्भात 469 लघू प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची एकूण जलसंचय क्षमता 1100.78 दलघमी इतकी आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत या प्रकल्पांत 107.34 दलघमी इतकाच जलसाठा शिल्लक आहे. ग्रामीण भागातील बहुतांश पाणीपुरवठा या धरणांवर अवलंबला आहे. त्यातील दीडशेच्या जवळपास धरणे कोरडीठण्ण पडली आहेत. मे व जून, अशी दोन महिने अजून शिल्लक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com