काय सांगता! गडचिरोली जिल्ह्यातील 72 शाळांना कुलूप?

file photo
file photo

गडचिरोली : कमी पटसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 72 प्राथमिक शाळा बंद करण्याचे संकेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे बंद झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन गावालगतच्या पाच किलोमीटर अंतरावरील उच्च प्राथमिक शाळेत केले जाणार आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी, असा निर्णय घेतला होता; मात्र शिक्षक संघटनांच्या विनंतीनंतर प्रक्रिया थांबली होती.

"गाव तेथे शाळा' असा संकल्प करून शिक्षण विभागाने गावागावांत प्राथमिक शाळा सुरू केल्या. मात्र, गेल्या काही वर्षांत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसेच नामांकित शाळांमध्ये विद्यार्थी पाठवण्याची प्रक्रिया राबविण्यात आल्याने ग्रामीण भागात जिल्हा परिषदेतील शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या रोडावली. कित्येक शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे. जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, कोरची, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, धानोरा व कुरखेडा या तालुक्‍यातील बहुतांश गावे दुर्गम आहेत. कित्येक गावामध्ये जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नाहीत.

त्यामुळे शिक्षणासोबतच अन्य सोयीसुविधासुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड केली जाते. पावसाळ्याच्या दिवसांत तर आठ-आठ दिवस शाळा बंद असतात. दुर्गम भागात शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम शिक्षणावर झाल्याचे दिसून येत आहे. आदिवासी भागामध्ये शेकडो गावातून वेगळे होऊन आठ ते दहा घरांची नवीन वस्ती निर्माण झाली. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांसाठी शासनाने वस्ती शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, कालांतराने या शाळांतीलही पटसंख्या कमी झाल्याने वस्तीशाळांचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रूपांतर करून तेथे कार्यरत शिक्षकांचे अन्य ठिकाणी समायोजन करण्यात आले.

20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये शिक्षकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्यावर वेतनापोटी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. ही समस्या ओळखून शिक्षण विभागाने आता कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली असून यासंदर्भात जिल्ह्यातील साधन केंद्रांना माहिती देण्यात आली आहे.

संधीचा फायदा घेतात शिक्षक
जिल्ह्यात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन किंवा तीन शिक्षक कार्यरत आहेत. अशा शाळांतील अनेक शिक्षक आळीपाळीने आपले कर्तव्य बजावत असल्याचाही प्रकार समोर आला आहे. एक ते चार वर्गासाठी दोन शिक्षक असले; तरी आठवडाभर एका शिक्षकाने शिकवायचे आणि दुसऱ्या शिक्षकाने दांडी मारायची, असा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याची धक्कादायक बाब तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी पंचायत समितीस्तरावर पोहोचल्या आहेत.

अतिदुर्गम काही गावांमध्ये तर शिक्षक पंधरा ऑगस्ट तसेच 26 जानेवारीला झेंडा फडकवण्यासाठी जात असल्याच्या तक्रारी आल्याने कमी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सत्रात याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com