नागपूर : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गेल्या पाच, सात दिवसांपासून पाण्याखाली असताना सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. सरकारकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पैसा आहे. परंतु, पूरग्रस्तांसाठी नाही, अशी टीका करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारचा निषेध नोंदविला.
रविभवन येथे पत्रकारांशी बोलताना ऍड. आंबेडकर म्हणाले की, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे शहर, विदर्भातील काही भागात पूर परिस्थिती आहे. सातारा, कोल्हापूर, सांगलीमधील नागरिक गेल्या सात दिवसांपासून पाण्यात आले. घरातील सर्व साहित्य पाण्याखाली आल्याने खराब झाले. खायला अन्न नाही. असे असताना सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. खावटीची रक्कमही मिळाली नाही. विरोधी पक्षातील कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे लोक मदत करीत आहे. शिबिरात ठेवण्यात आलेल्या नागरिकांनाही सरकारने काहीचे दिले नाही. जिल्हाधिकारी यांना विचारणा केली असताना सरकारकडून काहीच आदेश नसल्याचे सांगत आहे. खावटीच्या मदतीसाठी 48 तास पाण्याची अटी जाचक असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री दौऱ्यात व्यस्त आहेत. मोझरी येथे झालेल्या कार्यक्रमावर जेवढा खर्च करण्यात आला, त्याचा एक भागही पूरग्रस्तांवर खर्च केला असता तर मोठी मदत झाली असती. मंत्री, सत्ताधार आमदार दौऱ्याच्या नावाने पर्यटन करीत असल्याने म्हणत मंत्र्यांच्या सेल्फीवरही त्यांनी टीका केली.
धरणांसाठी नियोजन समिती असावी
कर्नाटकमधील अलमायटी धरणाचे दरवाजे बंद असल्याने नदीचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. हे पूर्णपणे भरल्यास सांगली शहर वर्षभर पाण्याखाली राहील. कृष्णा, अलमायटी व इतर धरणांच्या नियोजनांसदर्भात एक समिती गठित करण्याची मागणी करण्यात आल्याचे ऍड. आंबेडकर यांनी सांगितले.
288 जागा लढण्याची तयारी
कॉंग्रेसतर्फे अद्याप कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नाही. माध्यमांच्या माध्यतूनच माहिती मिळत आहे. चर्चा झाल्यास जागांबाबत ठरवू. आमची सर्व 288 जागा लढण्याची तयारी आहे, असे ऍड. आंबेडकर म्हणाले. बाबासिद्धीकी मित्र आहे. त्यांच्या पक्षात येण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा नसल्याचे त्यांनी सांगितले. ईव्हीएम विरोधात विरोधकांकडून आवाज उचलण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यात तफावत असताना यावर ते बोलत नाही. ब्लॅकमेलिंगमुळेच ते बोलत नसल्याचे आंबेडकर म्हणाले. विधानसभेपूर्वी जिल्हा परिषदांच्या निवडणुका घ्यायच्या नसल्याने मुख्यमंत्री पळवाटा काढत असल्याचे ते म्हणाले. |
|