‘त्या’ १५ गावांची तहान भागत का नाही?

tractor-water-tanker
tractor-water-tanker

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्यात चिखलदरा तालुक्‍यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई  निर्माण होते. दरवर्षी उपाययोजनांसाठी निधी खर्च करण्यात येतो. आतापर्यंत लाखो रुपये  पाण्यासारखे खर्च झाले असले, तरी ‘त्या’ १५ गावांची पाणीटंचाई मात्र काही केल्या दूर  झालेली नसल्याने अध्यक्षांनी शुक्रवारी संताप व्यक्त केला.

टंचाईग्रस्त गावांमध्ये  कायमस्वरूपी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई विभागाकडून आराखडा  तयार करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी  शुक्रवारी दिले.

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीची सभा शुक्रवारी (ता. ३) पार पडली. या सभेत  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. अध्यक्ष बबलू देशमुख  यांनी सुरुवातीलाच चिखलदरा तालुक्‍यातील कायमस्वरूपी टंचाई असणाऱ्या १५ गावांमधील  टंचाईचा आढावा घेतला.

तसेच आजवर झालेल्या उपाययोजनांवरील खर्चाचा तपशील कार्यकारी अभियंता राजेंद्र  सावळकर यांच्याकडे मागितला. त्यावर आजवर बराच निधी या गावांतील उपाययोजनांवर  खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे ही फाइल  सोपविण्यात आल्यानंतरही कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने अध्यक्षांनी  अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

याशिवाय चांदूरबाजार तालुक्‍यातील काही गावांमधील पाण्याच्या टाक्‍यांची कामे निकृष्ट  असल्याची बाब अध्यक्षांनी समोर आणली. संबंधितांची देयके थांबविण्याचे निर्देश त्यांनी  दिलेत.

सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे,  सदस्य गौरी देशमुख, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे यांच्यासह अन्य  अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com