सावधान : शेतात घुसले डुक्कर

file photo
file photo

धाबा (चंद्रपूर): वन्यजीवांकडून शेतातील उपद्रव थांबविण्याची मागणी घेऊन वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेणारी पोडसा ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ठरली. यावेळी वन्यजीवांना हैदासावर उपाययोजना करून असे आश्‍वासन गावकऱ्यांना देण्यात आले होते. मात्र याची पूर्तता झाली नाही. परिणामी जंगली श्वापदांच्या शेतातील धुडगुसाने बळीराजा रडकुंडीला आला आहे. शेकडो एकरावरील पिकाची नासधूस झाली आहे. 
गोंडपिपरी तालुक्‍यातील जुना पोडसा शेतशिवारात दोन महिन्यांपूर्वी वाघीण मृताअवस्थेत आढळून आली होती. शेतकऱ्यांनी विषप्रयोग केला. त्यामुळे वाघिणीचा मृत्यू झाला, या संशयावरून वनविभागाने गावातील शेतकऱ्यांना चौकशीच्या नावावर छळले होते. या कारवाई विरोधात पोडसा ग्रामस्थानी वनविभागाच्या विरोधात मोर्चा काढला. ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. वन्यजीवांचा बंदोबस्त करा, अशी एकमुखी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. ग्रामसभेत उपस्थित असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्यजीवांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन ग्रामसभेत दिले होते.
आजघडीला पोडसा शेतशिवारात वन्यजीवांचा मोठा हैदोस सुरू आहे. रानडुक्कर,रोही,सांबर,चितळ या वन्यजीवांकडून शेकडो एकर शेतातील पिकांची नासधूस सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांनी धाबा येथील मध्य चांदा वनविभागाचे कार्यालय गाठून वन्यजीवांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामसभेत दिलेल्या आश्वासनाची आठवण ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना करून दिली. परंतु ग्रामसभेत वन्यजीवांचा बंदोबस्त करण्याचे जाहीर आश्वासन देणाऱ्या वनविभागाने" तो मी नव्हेच' म्हणत हात वर केले. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहे. 

पाच एकरातील कपाशी फस्त
पोडसा गावातील भारत घ्यार यांनी नऊ एकरात कपाशीची लागवड केली. नऊ एकर पैकी जवळपास पाच एकर मधील कपाशीची रानडुकरांनी नासधूस केली आहे. घ्यार यांचे जवळपास एक लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचाही फटका उर्वरित कपाशीला बसला आहे. त्यामुळे अस्मानी आणि जंगली संकटाने घ्यार यांचे कंबरडे मोडले आहे.


वाघ आणि वनविभागाची भीती 
पोडसा शेतशिवारात वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतरही वाघीणीचा वावर असल्याचे अनेकदा समोर आले आहे. शेतकऱ्यांना वाघाच्या पंजांचे ठसे शेतशिवारात आढळून आले. वाघाची भीती कायम आहे. दुसरीकडे वाघीण प्रकरणात वनविभागाने चौकशीचा नावावर शेतकऱ्यांचा छळ केला. वाघ आणि वनविभागाच्या भीतीने शेतकऱ्यांनी जागल बंद केली परिणामी वन्यजीवांना अख्खे शेतच मोकळे झाले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com