दादा, झाडे लाव अन्‌ पर्यावरणाचे संरक्षण कर...बहिणीने भावाला दिला पर्यावरणपूरक राख्यांतून संदेश

गोंदिया : बियांपासून राख्या तयार करताना महिला.
गोंदिया : बियांपासून राख्या तयार करताना महिला.

गोंदिया : वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. याचे परिणाम, मानवी जीवनावर होत आहेत. पर्यावरणाची हानी होत आहे. हे टाळण्यासाठी रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील सुमन बहुउद्देशीय संस्थेने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. झाडांच्या बियांपासून त्यांनी राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांवर पर्यावरण संरक्षणाचा संदेशही कोरला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधेल तेव्हा एकप्रकारे दादा, झाडे लाव अन्‌ पर्यावरणाचे संरक्षण कर, असा संदेश बहीण आपल्या भावाला देणार आहे.

सुमन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने काही दिवसांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने "बियांची बॅंक' हा उपक्रम राबविण्यात आला. विविध प्रजातींच्या झाडांच्या बियांच्या संकलनातून संस्थाध्यक्ष वर्षा भांडारकर यांनी विद्यार्थिनींसह जवळपास सात ते आठ महिला बचतगटांच्या महिलांना बियांपासून पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

बियांपासून पर्यावरणपूरक राख्या

विविध प्रजातींच्या बियांचा वापर करून प्लॅस्टिक व रासायनिक पदार्थांचा वापर न करता पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आता स्वतः बचतगटांतील महिलांना प्रशिक्षण दिले आहे. रंगीत कागद, कपडे, लोकरींचा वापर करून या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. जवळपास 400 ते 500 राख्या महिला बचतगटातील महिलांनी तयार केल्या आहे. या राख्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाशिवाय "बेटी बचाओ, बेटी पढाओ" वृक्ष लागवड, इको फ्रेंडली गणपती आदींवर आधारित संदेश कोरला आहे.

वृक्षलागवड मोहिमेत महिलांचा वाटा

बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेली ही राखी हातून निघाल्यानंतरही एका वृक्षाच्या रूपातून तिच्या प्रेमाची साक्ष देणारी ठरणार आहे. या उपक्रमात नंदिनी भांडारकर, ज्योती कोठेवार, प्रभावती सिंहमारे, सुशीला कोठेवार, सौ. चंदेल सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, राख्यातील बियांचे रोपण करून वृक्ष लागवड मोहिमेला मोठा हातभार लागेल, असे आरएफओ श्री. साबळे यांनी सांगितले. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत महिलांचा फार मोठा वाटा राहील, असे कोमल बचतगटाच्या अध्यक्ष अश्‍विनी फाये यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक उपक्रम
वृक्षतोडीचा फटका सगळ्यांचा बसत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. हे टाळण्यासाठी वृक्षलागवड करून पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी यंदा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला. वसुंधरेला हिरवेगार ठेवून समाजात अशा उपक्रमातून चांगला संदेश दिला जाईल.
- वर्षा भांडारकर, संस्थाध्यक्ष, सुमन बहुउद्देशीय संस्था, गोंदिया.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com